World Mental Health Day : माणूस एवढा रागीट का झालाय? कारण क्षुल्लक पण थेट होताहेत खून | पुढारी

World Mental Health Day : माणूस एवढा रागीट का झालाय? कारण क्षुल्लक पण थेट होताहेत खून

नाशिक : दीपिका वाघ

बायकोने स्वयंपाक कमी केला म्हणून पतीने हातोड्याने केली मारहाण, घरातले सदस्य लहान बाळावर प्रेम करतात म्हणून आईनेच घेतला बाळाचा जीव, बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोलपंपचालकाला मारहाण, दारू पिणाऱ्या मुलाने केला वडिलांचा खून, हॉर्न वाजवला, तंबाखू दिली नाही, सोशल मीडियावर पोस्ट केली, दारूसाठी पैसे दिले नाही, प्रेमात अडथळा म्हणून प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून… (World Mental Health Day) शहरात घडणाऱ्या या सर्व घटना पाहता माणूस एवढा रागीट का झालाय? असा प्रश्न पडतो.

संबधित बातम्या :

माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस आता माणूस म्हणून जगत नाही. कारण समाजात काही प्रसंग सोडले, तर मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरली आहे. राजकारणात घडणाऱ्या घडामोडींमुळे तर आता सर्वसामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे. शहरातील रोजची रहदारी पाहता कट मारला, ओव्हरटेक केला, हॉर्न वाजवला, तरी किरकोळ कारणाचे रूपांतर शिवीगाळ नंतर हाणामारीत होते. घरात आई-वडिलांमध्ये बेबनाव असला की, मुलांच्या मानसिकेतवर परिणाम होतो. बऱ्याचदा पती-पत्नीच्या भांडणामुळे कोवळ्या जिवांचा बळी जातो. आईवर अवलंबून असलेले मूल आईनेच सोडून दिले, तर मूल अधिक आक्रमक होते. नोकरदार वर्गावर स्पर्धेत टिकण्यासाठी कामाचा ताण तर वाढला पण स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात उत्पन्न मात्र तेवढेच राहिल्याने सर्वसामान्य माणूस नैराश्यात येऊन टोकाचे पाऊल उचलताना दिसतो. सोशल प्लॅटफॉर्मवर एखादी सकारात्मक पोस्ट असली, तरी त्यामध्ये खुसपट काढून ‘सोशल’ कलह वाढत जातात. त्यातून फक्त मानसिक ताण वाढतो, सिद्ध मात्र काही होत नाही. आजूबाजूला मित्रपरिवाराचा गोतावळा भरपूर आहे, तरी माणूस मात्र एकटा पडत चालला आहे आणि मेंदूवर प्रमाणापेक्षा जास्त ताण आला की, त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर जाणवायला लागतात. (World Mental Health Day)

– हल्ली शब्दानेही माणूस दुखावला जातो

– समजूतदारपणा कमी, गैरसमजात वाढ

– चांगल्या हेतूने टाकलेल्या पोस्टला विरोधच

– दुचाकी चालवताना ओव्हरटेक केला, तरी खुनशी नजरेने बघणे

– सर्वच मिळण्याची हाव आणि संपत चाललेला संयम

– राजकारणात घडणाऱ्या राजकीय घडामोडी

– सतत इतरांना जज करत राहणे

यावर उपाय कोणते? 

ज्या ठिकाणी नकारात्मकता आहे, त्या वातावरणापासून नेहमी लांब राहावे. स्वत:चे छंद जोपासून नवनवीन कल्पना विकसित करता येऊ शकतात. स्मार्ट फोन आणि सोशल प्लॅटफॉर्म हे केवळ संवादाचे माध्यम आहे. त्यावर फार अवलंबून राहू नये. त्यांना गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिले की, मानसिक परिणाम जाणवायला लागतात. (World Mental Health Day)

संवाद न झाल्याने विसंवाद होऊन त्यात क्लेश, कलह, तंटे, गैरसमज, द्वेष या भावना बळावतात. एककल्ली, स्वमग्न आणि स्वार्थी वृत्ती बळावते, त्याचे पर्यवसन अनेक चुका ते गुन्हे अशा कृत्यांत होत असते. त्यासाठी कुटुंबात आल्हाददायक वातावरण असावे आणि यंत्रांपेक्षा माणसांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा.

– डॉ. प्राजक्ता लेले, कन्सल्टिंग फिजिशियन आणि समुपदेशक

हेही वाचा :

Back to top button