

राजगुरुनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यातील रेटवडी गावच्या वैकुंठ स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके आणि पाय आणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या अघोरी कृत्याचा गुप्तधन शोधासाठी अंधश्रध्दा केल्याशी संबंध जोडला जात आहे. या घटनेने गावातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सोमवारी (दि. १७) रात्री हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे.
कुटुंब किंवा नात्यात वारंवार अशुभ अथवा दुर्दैवी घटना घडल्या की त्यावर अंधश्रधदेच्या माध्यमातुन उपाय शोधला जातो. त्याचप्रमाणे एखादे धन, संपत्ती मिळवायला म्हणुन सुध्दा असे प्रकार घडतात. अश्याच कोणत्या तरी कारणाने अज्ञात व्यक्तीने रेटवडी (ता. खेड ) येथे हा अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे. आषाढ महिन्याच्या सोमवारी (दि. १७) दिप अमावस्या होती. अघोरी कृत्यासाठी हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावच्या स्मशानभूमीत मारलेल्या बोकडाचे मुंडके आणि पाय, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. मंगळवारी सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध घेऊन असा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रेटवडीचे माजी सरपंच दिलीप पवळे, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार व ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा: