बेळगाव पुढारी वृत्तसेवा : ईडीकडून काँग्रेस नेत्यांचा राजकीय हेतूने छळ सुरू असून ही कारवाई तत्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला काँग्रेस भवनासमोर त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसने देशहिताच्या दृष्टीने मोलाची कामगिरी केली असताना भाजप नेत्यांकडून गैरसमज पसरवून ईडीचा गैरवापर सुरू आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात वैयक्तिकमधून सूट दिली असतानाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांना ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. राहुल गांधींची दिवसांतून 10 तासांहून अधिक वेळ चौकशी केली जात आहे.
काँग्रेसच्या नेत्यांवर सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर ईडी कार्यवाही रद्द करण्यात यावी, नेते आणि कार्यकर्त्यांना शांततापूर्ण आंदोलनांपासून रोखण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजू सेट, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिकोडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिगळे, प्रदीप एम. जी., पंचनगौड द्यामनगौडर, मलगौडा पाटील, सोहेब अत्तार, इरफान अत्तार, मन्सूर सय्यद, कार्तिक पाटील, राजश्री मोकाशी, आयेशा सनदी आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा