

Vijayapura Highway Car Accident Three Dead
अंकली : विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर शुक्रवारी (दि.१०) झालेल्या भीषण कार अपघातात आई आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये सत्यवेणी (वय ३८), त्यांचा मुलगा हरिवेंकटराम (२०) आणि जश्चंत (१८) यांचा समावेश आहे. तर राघवेंद्र (४१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
हे कुटुंब कारटगी येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. केए-३३ एन-४६८९ क्रमांकाची कार नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
प्राथमिक तपासात चालकाला झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मनगुळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.