

विजापूर : दोन महिन्यांच्या चिमुकलीची कुटुंबीयांनीच विहिरीत फेकून हत्या करुन ती बेपत्ता झाल्याचे भासविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुरडीचा मृतदेह विहिरीत सापडला असून, ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ९) बिदर जिल्ह्यातील वडगावमध्ये (ता. औराद) उघडकीस आली.
मुलगी हरवल्याचा बनाव करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशीत हत्येचे गूढ उकलले. या प्रकरणी आईसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आई वाणीश्री (वय ३२), मामा संतोष मस्कले (वय ३५), आजोबा बसप्पा मस्कले (७०) आणि आजी रत्नम्मा (वय ६५) अशी त्यांची नावे आहेत.
वाणीश्रीचा विवाह महाराष्ट्रातील देगलूर तालुक्यातील कवळगडमधील संजय याच्याशी वर्षभरापूर्वी झाला होता. बाळाच्या जन्मानंतर वाणीश्री गेल्या दोन महिन्यांपासून वडगावमधील माहेरी राहत होती. शनिवारी रात्री तिने पती संजयला फोन करुन बाळ हरवल्याचे सांगितले. यानंतर संजय तातडीने वडगावात पोचला.
नातेवाईकांसह बाळाचा शोध घेतल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. बाळ देवाने स्वतःकडे नेल्याची खोटी कहाणी कुटुंबीयांकडून सांगितली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे संशया बळावल्याने संतपुरा पोलिसांनी कुटुंबीयांना ताब्यात घेऊन स्वतंत्रपणे चौकशी केली. चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी बाळाची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयितांनी दिलेल्या माहितीवरुन संगमेश्वर मंदिराजवळील विहिरीता शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या हत्येमागे अंधश्रद्धेचा संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. हत्येचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. संतपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.