बेळगाव : पुढारी वृत्तसेवा आपण विवाहित आहोत, मुले आहेत हे विसरुन महिला आपल्यापेक्षा वयाने कमी असणार्या तरुणांसोबत पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकरणात त्या स्वतःच्या मर्जीने जात असल्याने हा पेच कसा सोडवायचा, असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. बेळगाव तालुक्यातील दोन घटना ताज्या असतानाच आता बसवण बागेवाडीतही अशीच घटना घडली आहे.
गेल्या आठवड्यात गणेशपूर परिसरात घडलेली घटना चर्चेचा विषय ठरली. 10, 15 व 19 वर्षांची मुले असलेली विवाहिता तिच्यापेक्षा चार वर्षे वयाने लहान असलेल्या तरुणासोबत पळून गेली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. मुलांनी आई पाहिजे, अशी विनंती पोलिसांना केली. परंतु, आई पुन्हा तिच्या मुलांकडे जाण्यास राजी होईना. स्वतः महिलाच जात नाही म्हटल्यानंतर पोलिसांचाही नाईलाज झाला. त्यांनी मुलांसह काका-काकूंना परत पाठवले.
अशीच घटना बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात नुकतीच घडली. या गावातील विवाहिता एका तरुणासोबत 15 दिवसांपूर्वी पळून गेली आहे. हे दोघेच गेले असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात होत आहे. शिवाय सदर महिला बेपत्ता झाल्याची फिर्यादही पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे.
तालुक्यातील या दोन घटना ताज्या असतानाच बसवण बागेवाडीत चक्क 16 वर्षाच्या मल्लिकार्जुन नामक अल्पवयीन युवकाला घेऊन 28 वर्षाची मल्लम्मा ही दोन मुलांची आई फरार झाली आहे. हे दोघेजण एका फॅक्टरीत कामाला होते. तेथेच त्यांच्यात प्रेमांकुर फुलला. भेटी वाढल्या अन् एक दिवस मल्लम्माने मल्लिकार्जुनला चांदीची साखळी भेट दिली. या दोघांची जवळीक वाढत असल्याची कल्पना मल्लिकार्जुनच्या आईला आली. तिने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रेमात आकंठ बुडालेल्या मल्लिकार्जुनने आई मल्लम्माला बोलली म्हणून चक्क विषप्राशन केले. यातून तो बरा होऊन तो कामालाही जात होता. परंतु, महिन्यापूर्वी तो बेपत्ता झाल्याची फिर्याद आईने पोलिस ठाण्यात दिली. त्याचवेळी मल्लम्मासुद्धा दोनपैकी एका मुलाला घेऊन फरार असल्याचे आढळून आले. यावरुन हे दोघेच पळून गेला असल्याचा कयास बांधत पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
असे एखादे प्रकरण ठाण्यात गेल्यानंतर ते हाताळायचे कसे? असा प्रश्न ठाण्यातील अधिकारी व पोलिसांनाही पडतो. कारण, एक तर ते सज्ञान असतात. शिवाय त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या मर्जीचा असतो. त्यामुळे, असे प्रकरण आले तर ते कोणत्या कायद्यात बसवायचे अन् कोणावर कारवाई करायची, असा प्रश्न पोलिसांना पडतो.
कॅम्प ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूरमध्येच महिन्यापूर्वी एक घटना घडली होती. 40 वर्षाच्या महिलेने एका 90 वर्षाच्या निवृत्त कर्नलसोबत नोंदणी विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सदर वृद्धाला मासिक 1 लाख 80 हजार पेन्शन आहे. या वृद्धाच्या मुलांनी दिलेल्या तक्रारीमुळे हे प्रकरणही पोलिस ठाण्यात गेले होते. परंतु, या महिलेने वृद्धाशी कायदेशीर लग्न केल्याचे सांगून पोलिसांनी हात वर केले.