

बेळगाव : रोज अडीचशे ते तीनशे टन कचरा संकलन करणाऱ्या महापालिकेकडे कचरा रस्त्यात टाकू नये, यासाठी केवळ २५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. महापालिका स्वच्छतेचा कितीही डांगोरा पिटत असली शहरात कचऱ्याच समस्या जटील होत चालली आहे. अशातच सिटीज २.० ही योजना रखडली असल्यामुळे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काय होणार, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेने नुकताच लोकांना कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीकडे देण्याचे आवाहन केले आहे. पण, ओला आणि सुका कचरा या दोन प्रकारच्या वर्गीकरणालाच लोकांचा प्रतिसाद मिळत नसताना आता चार प्रकारच्या वर्गीकरणाची अट घालण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत. त्याकडे महिनोमहिने महापालिकेचे लक्ष जात नाही. सफाई कामगार, आरोग्य निरीक्षक, अधिकारी आणि
नगरसेवकांना सांगूनही कचऱ्याची समस्या दूर होत नाही. त्यामुळे, लोकांना महापालिकेच्या कारभारावर विश्वास राहिलेला नाही. ब्लॅकस्पॉट हटवून त्याठिकाणी बेंच उभारणे, सुशोभिकरण करणे असा उपक्रम महापालिका करत आली आहे; पण काही दिवसांतच या सुशोभीकरणावर कचरा पडत आहे. त्यामुळे हा उपक्रमची कुचकामी ठाला आहे.
महापालिकेकडे सध्या २५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून ते उभारण्यात आले आहेत. त्यापैकी पाच कॅमेरे भूमिगत कचरा कुंडाजवळ उभारण्यात आले आहेत. कचरा रस्त्यात टाकू नये, यासाठी २०० सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या सिटीज २.० या योजनेच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पण, ही योजनाच अद्याप रखडलेली आहे.
समन्वयाचा अभाव महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेत समन्वय नसल्यामुळे योजना बारगळण्याची शक्यता आहे. या योजनेतून मिळणाऱ्या १३५ कोटींवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. या योजनेतून ७० कोटी मंजूर झाले आहेत, असे सांगण्यात आले होते. पण, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही दिसून आलेली नाही.
महापालिकेकडून कचरा उचल वेळेवर आणि सुनियोजित व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. शहरातील अनेक ब्लॅकस्पॉट हटविले आहेत. पण, काही ठिकाणी अजूनही कचरा टाकण्यात येतोय. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यासाठी लोकांनीही पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
- हणमंत कलादगी, पर्यावरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते.