पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेची बांधिलकी महाराष्ट्र एकीकरण समितीशी आहे. इथे महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे शिवसेना असे आम्ही मानतो. आमचा कोणताही स्वार्थ नाही कारण जर आमच्यासारखे लोक बेळगावात, सीमाभागात एकीककरण समितीच्या विरोधात प्रचाराला आलो तर आम्ही महाराष्ट्रात १०५ हुतात्म्यांना काय तोंड दाखवायचं हा पहिला प्रश्न आणि महाराष्ट्रातून जे प्रमुख नेते ते कोणत्याही पक्षाचे असोत, सत्ताधारी असोत किंवा अन्य असतील हे जेव्हा बेळगावात येतात आणि एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतात. आपल्या मराठी उमेदवारांना पाडण्यासाठी सर्व फौजफाटा घेऊन येतात. असं करणं म्हणजे सीमा भागावरील आपला दावा कमजोर करणं होय. सर्वोच्च न्यायालयात आपला खटला सुरु आहे. तिथे आपल्याला न्याय मिळत नाही, तिथे तो दावा कमजोर होईल (Karnataka Election 2023) असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते बेळगावमधून माध्यमांशी बोलत होते.
कर्नाटक सरकार आपल्या लोकांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय करते, दडपशाही करते त्याला बळ मिळेल. पण त्यांना बळ द्यायचं की मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहायचे हा एक साधा विचार महाराष्ट्रातून येथे येणाऱ्या नेत्यांनी करायला पाहिजे. इतकी बेईमानी करायला नको पाहिजे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी अजिबात संबंध नव्हता. किंबहूना कोणत्याही लढ्याशी त्यांचा संबंध नव्हता.
देशातील स्वातंत्र्य लढा असो किंवा महाराष्ट्रातील लढा असो भाजप कधी कोणत्याही आंदोलनात नव्हते. आम्ही सगळे होतो. शिवसेना होती, कॉंग्रेसचे काही प्रमुख नेते होते. कम्युनिस्ट नेतेही होते. तरीही गेल्या काही वर्षात पाहिलं तर भारतीय जनता पक्षातील प्रमोद महाजन असतील, एखनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील असतील हे काही प्रमुख नेते असतील यांनी कधीही सीमाभागात येऊन मराठी माणसाच्या विरोधात प्रचार केला नाही. पण गेल्या सात आठ वर्षात असं विष पेरलं जात आहे. म्हणून मी काल येथील लोकांना आवाहन केले की, महाराष्ट्रातील काही नेते तुम्हाला खतम करतील. किमान तुम्ही निषेध नोंदवा.
पुढे बोलत असताना राऊत म्हणाले, लोक दहशतीखाली आहेत. लोकांना धमकावले जात आहे. त्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो, बुलडोझर फिरवला जातो, पण माझ मत व्यक्त करणं माझ काम आहे. तुम्ही काळा दिवस का पाळतात, रस्त्यावर उतरता, आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे. मग तुमच्या विरोधात लोक येतात. तुम्ही त्यांच्या विरोधात राहीलं पाहिजे. तुम्ही फक्त कर्नाटक सरकारच्या विरोधात उभे राहून चालणार नाही. याला राजकारण म्हणतात. कर्नाटक सरकाराने अत्याचार केला की तुम्ही आवाज उठवतात पण जेव्हा आमच्या राज्यातील लोक येतात तेव्हा तुम्ही कसं काय थंड बसता, असं असेल तर आम्ही प्रचाराला येणार नाही.
महाविकास आघाडी बांधण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा होता. राष्ट्रवादी अंतर्गत शरद पवार खुर्चीवरुन बाजूला झाले. याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा जागेवर होईल का? यावर बोलत असताना राऊत म्हणाले मला तसं वाटत नाही आणि सध्या जे काही सुरु आहे ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अतंर्गत बाबी आहेत. शेवटी पक्षामध्ये कोणता निर्णय घ्यायचा हा त्यांच्यातील सर्वोच्च नेत्यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही भूमिका घेणं बरोबर नाही. पण शरद पवार हे जाणकार आणि अनुभवी आहेत. त्याच्यामुळे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने विचार करतील याची आम्हाला खात्री आहे.
हेही वाचा