मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्‍या नेत्यांना बेळगावमध्‍ये अटक | पुढारी

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्‍या नेत्यांना बेळगावमध्‍ये अटक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देण्यासाठी गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना पोलिसांनी अटक केली. या विरोधात सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा आज (दि. 6) बेळगाव दौरा होता. पण, त्यांनी हा दौरा लांबणीवर टाकला. महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी कन्नड संघटनांनी आंदोलन केले होते. सरकारनेही तसे पत्र महाराष्ट्राला पाठवले होते. अखेर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना जिल्हा बंदी केल्याचा आदेश बजावला होता.

या बंदीमुळे महाराष्ट्रातील नेत्यांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेऊन सीमावाद तत्काळ सोडवावा, अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकारी पाटील यांच्याकरवी पाठवण्यासाठी म. ए. समिती नेते आज दुपारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमले होते. पण, या नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या मनमानी कारवाईविरोधात सीमाभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button