नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. यावर आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे म्हणत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीवर बोलणे टाळले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात असंख्य प्रश्न असून, त्याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक दौर्यावर असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, 'महाराष्ट्रात शेतकर्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर पाऊस पडतो की नाही? अशी स्थिती आहे. यामुळे आपण सर्वांनीच या गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी माझा महाराष्ट्र दौरा सुरू असून, समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर संभाजीराजे यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, यावर आपल्याला काहीही बोलायचे नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीत पुरस्कृत उमेदवार केले असते तर शिवसेनेवर अशी वेळच आली नसती, अशा प्रकारचे विधान केले होते.
राज्यकर्त्यांना सुनावले
राज्यात जे कुठलेही सरकार असेल तर लवकरात लवकर येऊ द्या. सामान्य जनतेचे, कामगारांचे, कष्टकर्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत, असे सांगत छत्रपती संभाजीराजे यांनी थेट राज्यकर्त्यांना सुनावले.