जगणे आनंददायी करण्यासाठी... Pudhari File Photo
विश्वसंचार

जगणे आनंददायी करण्यासाठी...

आनंदी जीवन जगण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती

पुढारी वृत्तसेवा

काही लोकांचे आयुष्य पाहिले की ‘जीवन त्यांना कळले हो’ असे म्हणावे लागते. मात्र बहुतांश लोकांचे आयुष्य ‘कसे जगायचे’ हे समजून घेण्यातच जाते! वेळीच जगण्याची काही ‘कौशल्ये’ आत्मसात केली की जगणे नुसते सुसह्यच होत नाही, तर आनंददायीही होते. हेन्री नांगिया यांनी त्यांच्या ‘लेसन्स लर्नड् टू लेट इन लाईफ’ या पुस्तकात जीवनात अशाच उशिरा कळणार्‍या गोष्टींचा उल्लेख केला आहे जसे की, मौल्यवान वेळ वाया घालवू नका, पैसे कमावण्याइतकेच तुम्ही आरोग्याकडेही लक्ष द्या आदी. या पुस्तकात वैयक्तिक विकासावरही भर देण्यात आला आहे. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींची ही माहिती...

आरोग्य हीच खरी संपत्ती

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तुम्ही निरोगी राहाल तरच तुम्ही सर्व कामे व्यवस्थित करू शकाल. जेव्हा तुम्ही निरोगी असाल, तेव्हाच तुम्ही भरभरून जगू शकाल. गोष्टींचा आनंद घेऊ शकाल. अशा वेळीच तुम्ही चांगले खाऊ शकता, चांगले कपडे घालू शकता, कुठेतरी प्रवास करू शकता. पण जर तुमची तब्येत थोडीशीही बिघडली तर तुमच्या आवडत्या वस्तूही बेरंग दिसू लागतात. जेव्हा खूप उशीर झालेला असतो, तेव्हाच एखाद्या व्यक्तीला हे समजते.

शिकणे कधीही थांबवू नका

आपला अभ्यास आणि काही छंद पूर्ण झाल्यावर आपण शिकणे बंद करतो. कदाचित जे काही शिकायचे होते ते शिकून झाले, असा विचार करत आता वय उलटून गेले आहे, असा विचार केला जातो. पण शिकण्याची मर्यादा नाही. तुम्हाला हवं ते, हवं तेव्हा तुम्ही शिकू शकता. गरज आहे ती आवड टिकवण्याची. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती अंगीकारल्याने तुम्हाला एक उत्तम, शिक्षित आणि चांगली व्यक्ती बनण्यास मदत होऊ शकते.

केवळ पैशासाठी काम नको

जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा पैशाने मिळतात हे सर्वांनाच माहीत आहे. तथापि, पद धारण करण्यासाठी हे एकमेव प्रेरक असू नये हे महत्त्वाचे आहे. परंतु पैसा हे सर्व काही नाही. अशी नोकरी किंवा व्यवसाय करू नका, ज्यामध्ये तुमच्या प्रियजनांसाठी किंवा स्वतःसाठी वेळ नसेल.

वर्तमानात जगा

तुमचे खरे जीवन तुमच्या जन्म आणि मृत्यूच्या क्षणांमध्ये नाही. तुमचे खरे आयुष्य आता आणि पुढच्या श्वासादरम्यान आहे. वर्तमान म्हणजे इथे आणि आता. म्हणून सध्याचा प्रत्येक क्षण पूर्णपणे शांततेने जगा. कोणतीही भीती किंवा पश्चात्ताप न करता. आणि या क्षणी तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. काही लोक भूतकाळात आणि त्याच्याशी निगडित पश्चात्तापांमध्ये आयुष्य घालवतात. यामुळे त्यांचा वर्तमानच खराब होत नाही तर त्यांच्या भविष्यावरही तितकाच परिणाम होतो. भविष्यकाळाचीही अवाजवी चिंता करण्यात अर्थ नसतो.

‘नाही’ म्हणायला शिका

काही लोकांना आयुष्यात ‘नाही’ म्हणता येत नाही आणि ते सर्व काही मान झुकवून स्वीकारत असतात. अनेक वेळा जेथे ‘नाही’ म्हणणे आवश्यक असते, तेथेही ते ‘हो’ म्हणतात. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. ‘नाही’ म्हणायला शिकलो नाही तर या लोकांच्या दबावाला बळी पडत राहू. सरळ झाडे नेहमी सर्वात आधी तोडली जातात अशी एक म्हण आहे. इतका सरळपणाही चांगला नव्हे!

अपयशातून शिका

या जगात अपयशाशिवाय यश मिळणे दुर्मीळ आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करता, तेव्हा तुम्ही यशस्वी होण्याची तितकीच अयशस्वी होण्याची शक्यता असते. अनेकदा असं म्हटलं जातं की, अपयश माणसांना थांबवत नाही. पण लोक ज्या पद्धतीने अपयशाला सामोरे जातात, तेच त्यांना पुढे जाण्यापासून रोखते.

निरुपयोगी गोष्टी

आपण काही गोष्टींवर अनावश्यक वेळ घालवतो. पैशाच्या मागे धावणे, लोकांवर रागावणे, वेळ वाया घालवणे, सतत कुणाशी ना कुणाशी भांडणे वगैरे. या सर्व गोष्टींना जीवनात काही अर्थ नाही. यामध्ये आपल्या शक्ती व वेळेचा निव्वळ अपव्ययच होतो. बाकी काही पदरी पडत नाही. पडलेच तर ते मन:स्तापाशिवाय दुसरे काही नसते. त्यामुळे फुटकळ गोष्टींना महत्त्व देणे, त्यावर वेळ घालवणे थांबवणे गरजचे असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT