पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा निर्धारित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्नायूंच्या दुखापतीतून सावरत असून, पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सहा सामन्यांच्या निर्धारित षटकाच्या मालिकेदरम्यान पुनरागमन करण्याची त्याच्याकडे चांगली संधी असेल. रोहितला दक्षिण आफ्रिका दौर्यापूर्वी कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, संघ रवाना होण्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याला संघाबाहेर पडावे लागले. (Virat vs Rohit)
पूर्णपणे फिट नसल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्या एकदिवसीय मालिकेतूनदेखील तो बाहेर पडला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रोहितचे रिहॅबिलिटेशन चांगले सुरू आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी तो ठीक होईल अशी अपेक्षा आहे. (Virat vs Rohit)
अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारीला होणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी अजूनही तीन आठवड्यांचा वेळ आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. एकदिवसीय सामने 6 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होणार असून, टी-20 आंतरराष्ट्रीय सामने 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान खेळवले जातील. रोहित गेल्या काही काळापासून दुखापतीचा सामना करीत आहेत. त्यामुळे 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यामध्ये निर्धारित षटकांच्या मालिकेनंतर सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघातून बाहेर रहावे लागले होते. (Virat vs Rohit)
बीसीसीआयच्या सध्याच्या नियमानुसार प्रत्येक खेळाडूला पुनरागमन करण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) अनिवार्य फिटनेस चाचणी करून खेळण्यासाठी फिट असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे लागते. या प्रक्रियेनंतर निवड समितीला खेळाडूच्या उपलब्धतेबाबत सूचित केले जाते.
विराटने कसोटीचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे रोहितला आता दुखापतीबाबत सावध राहणे आणखीन गरजेचे झाले आहे. गेले काही वर्ष रोहित सर्वच प्रकारात संघासाठी चांगला कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. बीसीसीआयकडून पुढील युवा कर्णधाराचे नाव निश्चित होण्यापूर्वी रोहित शर्मा कमीत कमी चार ते पाच वर्षे संघाचे नेतृत्व करू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.