नागपूर, पुढारी वृत्तसेवा: सगळं राजकारण हास्यास्पद सुरू आहे. स्वातंत्र्यदिन आला पण पालकमंत्र्यांचा अद्याप पत्ता नाही. राज्य मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री नियुक्तीसाठी एवढा वेळ होत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला वेळ नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. (Vijay Wadettiwar)
अजित पवार यांच्या सरकारमध्ये प्रवेशानंतर आता कोल्ड वॉर सुरू झाले आहे. कालच्या मंत्रालयाच्या बैठकीतून आपल्याला दिसून आले असेल. तीन दिशेने तीन तोंड आहेत. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे ते बघतात. मलिदा खायचं असेल, तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नांसाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी यांना वेळ नाही. 28 मंत्री कार्यरत आहेत. 28 मंत्री 28 जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जाऊ शकले असते. जनतेला न्याय देऊ शकले असते, परंतु तिथे पालकमंत्रीच नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावे लागत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नावाची भीती संपूर्ण भाजपला वाटत आहे, गांधींनी, नेहरूंनी या देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे गांधी नावाची दहशत अजूनही भाजपला आहे. जसं मुघलांच्या काळात मुघलांना धनाजी आणि संताजीच्या बाबतीत होते. तशीच दहशत भाजपने घेतलेली आहे. मात्र, सत्य परेशान हो सकता पराजित नही, असा (Vijay Wadettiwar) दावा केला.
अविश्वास ठरावाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी केवळ काँग्रेसवर ताशेरे ओढले. त्यांनी काय केलं, त्यांच्या कोणत्या उपलब्धी ते काही ते बोलले नाही. केवळ भाषणातून काँग्रेसचा विरोध केला. ज्या मणिपूर मुद्द्यावर अविश्वास ठराव आणला होता, त्यावर ते पहिले दीड तास काहीच बोलले नाहीत.
या देशाचे गृहमंत्री किती ठासून खोटे बोलतात आणि देशाला किती चुकीची माहिती देतात. हे कलावतीच्या कालच्या स्टेटमेंट वरून आपल्याला समजले आहे. राहुल गांधींचे सामाजिक काम आणि जो शब्द आहे, तो पक्का आहे. हे देशवासीयांना माहित आहे. केवळ कलावतीच नाही, तर त्यामध्ये निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचे काम राहुल गांधींनी पूर्ण केले आहे. म्हणजे या देशात सत्य नाही, तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. हे गृहमंत्र्यांच्या भाषणातून देशाला कळून चुकले आहे.
दरम्यान, आजची आढावा बैठक यासंदर्भात छेडले असता, आढावा ही बैठक कोणत्या मतदारसंघातील राजकीय स्थिती कोणत्या पक्षाचे प्राबल्य, आमच्या बूथचे गठन झाले की नाही, आमची स्थिती काय आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फुटीनंतर परिस्थिती काय, या सर्वांचा आढावा घेऊन काँग्रेससाठी किती अनुकूल वातावरण आहे, दुसरा पक्ष मग ठाकरे गट असेल त्यांच्यासाठी किती अनुकूल आहे, याचा आढावा आम्ही घेत आहोत आणि ग्रासरूटच्या पदाधिकाऱ्यांना विचारून माहिती गोळा करावी आणि वस्तुस्थिती आपल्यासमोर असावी, ज्यावेळेस सीट वाटपाचा फॉर्म्युला येईल. तेव्हा आम्हाला सांगता येईल की पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदमध्ये कोणाचे वर्चस्व आहे. आणि त्याची तयारी म्हणून ही आढावा बैठक घेत असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
हेही वाचा