Latest

आम्ही एकत्र का आलो?, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

अविनाश सुतार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (दि.२३) संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने युती का केली? याबाबतचा खुलासा निवेदनातून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत!

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT