पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या सिल्क्यरा येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांशी तब्बल १० दिवसांनी व्हिडीओ संपर्क साधण्यात बचाव पथकाला मंगळवारी यश आले. त्यांनतर बचावकार्याला आणखी वेग आला आहे. आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचावकार्याबाबत आढावा घेतला. ( Uttarkashi Tunnel Rescue)
पंतप्रधान मोदी यांनी फोनवर बोलून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली, असे मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट केले आहे. धामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज फोनवर बोलताना बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. केंद्रीय एजन्सी, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि राज्य प्रशासन यांच्यात परस्पर समन्वयाने केलेल्या बचाव कार्याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. यावेळी त्यांना गेल्या २४ तासात झालेल्या बचावकार्याची माहिती दिली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये झालेल्या चर्चेमुळे मनोबल वाढले आहे. या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधानांकडून सतत मार्गदर्शन मिळत आहे. ज्यामुळे मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारी रात्रभर ड्रिलिंगचे काम सुरू होते. ऑगर मशीनद्वारे सहा ८०० मिमी पाईप टाकण्यात आले आहेत. ३६ मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्यात आले आहे. सातव्या पाईपचे वेल्डिंगचे काम सुरू आहे. ड्रिलिंग सकारात्मक दिशेने जात आहे. आता बोगद्यात सुमारे २० ते २२ मीटर अंतर बाकी आहे. कामगार सुमारे ५६ मीटर आत आहेत. अशा परिस्थितीत बचाव कार्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
हेही वाचा :