औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : जयश्री बचाऊ चौहाण या चितेगाव ता पैठण येथील महिलेच्या (४ वर्षीय) मुलीला घरासमोरून खेळत असताना फूस लावून पळवून नेले होते. ११ ऑगस्ट रोजी तीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. यानंतर जयश्री यांनी त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंद केली होती.
या तक्रारीवरून पोलिसांनी तीचा शोध सुरू केला होता. मात्र अपहरण झालेली मुलगी मुळची उत्तर प्रदेशची असल्याने तिला मराठी बोलता येत नव्हते. आजुबाजुला विचारपूस केली असता, काहीच उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती.
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता काहीही उपयुक्त माहिती मिळून येत नसल्याने तिचा शोध घेणे बिडकीन पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.
त्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक साहेब गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे बिडकीन प्रभारी सपोनि संतोष माने यांनी पोउपनि चव्हाण , पोहेकॉ साळवे , पोना म्हस्के , मपोना कुंदे , पोकाँ आधाट , पोकाँ गायकवाड व पोकॉ ६०४ आडे यांचे पथक तयार केले. सोशल मीडिया व्दारे पीडित मुलीचा फोटो प्रसारीत करून मुलीचा शोध सुरू केला.
या दरम्यान शुक्रवार दि ३ रोजी सकाळी ०७.०० वाजता सहायक पोलिस निरिक्षक माने यांना माहिती मिळाली की, पीडित मुलगी हि औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे भिक मागणाऱ्या महिलेकडे आढळली आहे. यावरून त्यांनी तत्काळ पोलिस उप निरिक्षक चव्हाण, पोलिस म्हस्के, मपोना कुंदे व पोका गायकवाड यांना रवाना केले.
यावेळी अपहरण झालेली मुलगी हि औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथील पुलाखाली भिक मागणाऱ्या जानवी अनिल कुसवाह (रा चिपळून) रेल्वेस्टेशन औरंगाबाद हिच्या ताब्यात सापडली. यावेळी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत मुलीची या महिलेच्या तावडीतून सुटका केली.
या महिलेकडे विचारपूस केली असता, सदर पीडित मुलीला चितगाव येथून भिक मागण्यासाठी पळवून नेल्याची संबंधीत महिलेने कबुली दिली. या घटनेचा अधिक तपास पोलिस उप निरिक्षक चळाण करीत आहेत.
पहा व्हिडिओ : पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
https://youtu.be/GZ1NtMjHO_g