नाशिक : गौरव अहिरे
राज्यात 2019 ते 2022 या चार वर्षांत 53 हजार 109 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात 10 हजार 634 पादचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ते, महामार्गांवरून पायी चालणारेही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
राज्यात रस्त्यांचे जाळे वाढत असून, त्यामुळे वाहतूक जलद होत आहे. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू व जखमींचे प्रमाण हा चिंतेचा विषय झालेला आहे. वाहनांचा वेग, वाहतूक नियम न पाळणे, चालकाला डुलकी लागणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघात होत आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू होत असून, गंभीर व किरकोळ स्वरूपात इतर नागरिक जखमी झाले आहेत. राज्यात जानेवारी 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 53 हजार 109 जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर 68 हजार 736 जण गंभीर जखमी झाले आहेत. याच कालावधीत 10 हजार 634 पादचार्यांचा मृत्यू झाला असून, 12 हजार 637 पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.
रस्ता ओलांडताना…
* उपलब्ध असेल तेव्हा क्रॉसवॉक आणि पादचारी क्रॉसिंग वापरावे. ट्रॅफिक सिग्नल शोधावे आणि योग्य सिग्नल, सुरक्षितपणे पार होण्याची वाट पाहावी.
* रस्ता ओलांडण्यापूर्वी नेहमी दोन्ही बाजूंना पाहावे, सतर्क राहावे आणि मोबाइल फोन किंवा हेडफोनचा वापर टाळावा.
* वाहनांच्या समोरून जाण्यापूर्वी चालक तुम्हाला दिसतील याची खात्री करावी.
* शक्य असेल तेव्हा फुटपाथवर चाला. फुटपाथ नसल्यास, जवळ येणारी वाहने पाहण्यासाठी येणार्या रहदारीकडे तोंड करून चालावे.
प्रकाशमान किंवा परावर्तित कपडे घालावे.
* वक्र, व्यस्त छेदनबिंदू किंवा महामार्ग यांसारख्या धोकादायक भागात वॉकिंग किंवा रस्ता ओलांडणे टाळावे.
* मुलांना रस्ता सुरक्षेबद्दल शिकवावे, ज्यात क्रॉसवॉक वापरणे, क्रॉसिंग करण्यापूर्वी दोन्ही बाजू पाहणे आणि रहदारीच्या जवळ असताना प्रौढ व्यक्तीचा हात धरणे आदी.
वर्ष अपघाती मृत्यू पादचारी मृत्यू
2019 12,788 2,849
2020 11,568 2,214
2021 13,528 2,677
2022 15,224 2,894
पादचार्यांची सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. या सावधगिरींचे पालन करून, आपण जोखीम कमी करू शकतो आणि प्रत्येकासाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करू शकतो. पादचार्यांनी खबरदारी घ्यावी व वाहनचालकांनीही वाहतूक नियम पाळण्यासोबत पादचार्यांची काळजी घ्यावी. जनजागृती करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. – डॉ. रवींद्र सिंघल, अपर पोलिस महासंचालक, महामार्ग पोलिस.