औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार किंवा भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास त्या केंद्राचे संकेतांक गोठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना विभागीय मंडळाने सर्व केंद्रांना दिल्या आहेत.
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ७८ हजार ४९९ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ६६ हजार ९६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंडळाकडून तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने विभागीय शिक्षण मंडळातर्फे नुकतीच विभागातील सर्व जिल्हानिहाय मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येत आहे.
यावेळी परीक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात एकाच बेंचवर एकच विद्यार्थी असावा, परीक्षेतील गैरप्रकार टाळावेत, परीक्षेत मुलांना बसण्यासाठी मंडप उभारू नये, पिण्याचे पाणी, फॅन, लाइट अशा भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात, केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
-हेही वाचा