पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : टीम इंडियाने 2023 ची पहिली मालिका जिंकून नववर्षाची शानदार सुरुवात केली. संघाने राजकोट येथे झालेल्या तिस-या निर्णायक टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग तिसरा मालिका विजय नोंदवला. मात्र या विजयातही काही उणिवा समोर आल्या. टीम इंडिया अतिरिक्त धावांची उधळपट्टी कशी रोखणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात (Team India ) युवा खेळाडूंचा भरणा करण्यात आला होता. संघाचे वरीष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा संघाने चाहत्यांना नाराज केले नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी यांनी संमिश्र कामगिरी केली. पण अतिरिक्त धावा देण्याच्या त्यांच्या कमकुवत बाजूने लक्षवेधले. यावर संघ व्यवस्थापनाने वेळीच उपायजोजना केली नाही तर संघासाठी ते धोक्याचे ठरेल, असा इशारा अनेकांनी दिला आहे.
राजकोट येथील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) 13 धावा अतिरिक्त दिल्या. त्यात 11 वाइड, एक नो तर 1 लेग बाय यांचा समावेश होता. अर्शदीप सिंगने 4 वाइड फेकले. तर उमरान मलिक (3 वाईड, 1 नो बॉल), हार्दिक पंड्या (2), अक्षर पटेल (1), चहल (1) यांनीही अतिरिक्त धावांत आपला वाटा उचलला. त्यामुळे श्रीलंकेला 137 पैकी 13 धावा फ्रीमध्ये मिळाल्या.
पुण्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुस-या सामन्यातही हीच समस्या भेडसावली. जिथे या सामन्यात अर्शदीप सिंग (5 नो बॉल), शिवम मावी (2 वाईड, 1 नो बॉल), हार्दिक पंड्या (1), उमरान मलिक (1 वाईड, 1 नो बॉल) यांनी 12 (1 लेग) अतिरिक्त धावा दिल्या. अर्शदीप सिंगने तर नो बॉलचा एकप्रकारे लाजिरवाणा विक्रम नोंदवला. सलग तीन नो-बॉल टाकल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने तर तोंड लपवले आणि नाराजी व्यक्त केली. समालोचकांनीही डावखु-या गोलंदाजावर जोरदार टीका केली. मात्र राजकोटमध्ये अर्शदीपने 20 धावात श्रीलंकेच्या 3 विकेट घेऊन भरपाई केली.
मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर झाला. टीम इंडियाने (Team India) तो सामना अवघ्या दोन धावांनी जिंकला. अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय गोलंदाजांना घाम फोडाला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अतिरिक्त धावा कमी दिल्या पण त्यामुळे सामना गमावण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या सामन्यात हर्षल पटेल (1 नो बॉल, 1 वाईड), हार्दिक पंड्या (1 वाईड), उमरान मलिक (1), अक्षर पटेल (1) यांनी अतिरिक्त धावा वाटल्या होत्या. दरम्यान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव या अनुभवी गोलंदाजांच्या संघातील समावेशानंतर अतिरिक्त धावा देण्यावर आळा बसेल असे अनेकांचे म्हणणे आहे.