नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political crisis) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबली होती. पण आज मंगळवारी दुपारी १२.३० वाजता यावर सुनावणी होणार आहे. या वेळी घटनापीठ स्थापन होण्याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाच्या सप्लिमेंटरी लिस्टमध्ये महाराष्ट्राशी संबंधित सदर खटल्याचा समावेश नव्हता. पण त्यानंतर हे प्रकरण पटलावर घेण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली.
सत्ता संघर्षाच्या सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करायचे की नाही, याचा निर्णय काल, सोमवारी होणार होता. पण सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठातील एक न्यायमूर्ती गैरहजर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलली गेली. त्यानंतर आज मंगळवारी सुनावणी होण्याचा अंदाज आहे. कोणत्या खटल्याची सुनावणी कधी घ्यायची, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयच घेत असते.
सप्लिमेंटरी लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी क्वचितच कामकाजात समाविष्ट होतात. सत्तासंघर्षाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली होती. सरन्यायाधीश रमणा हे येत्या २६ तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती उदय लळित हे येणार आहेत. अशा स्थितीत रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे.
सेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगात दावा ठोकलेला आहे. यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दोन्ही गटांना दिले होते. ठाकरे गटाने कागदपत्रे दाखल करण्याकरिता एका महिन्याची मुदत मागितली होती. तथापि आयोगाने ठाकरे गटाला तीन आठवड्याचा कालावधी दिला होता. हा कालावधी मंगळवारी संपत असल्याने ठाकरे गट निर्धारित कालावधीत कागदपत्रे सादर करतो की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :