Virat Kohli’s record breaking 26th T20 half century at Bengaluru’s M Chinnaswamy Stadium
बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दमदार अर्धशतक झळकावून आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर, कोहलीने 42 चेंडूत 70 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या अर्धशतकासह, कोहली टी-20 क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सचा जागतिक विक्रम मोडीत काढला. कोहलीने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर टी-20 मध्ये एकूण 26, तर हेल्सने नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज मैदानावर 25 अर्धशतके झळकावली आहेत.
विराट कोहली : चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू : 26 अर्धशतके
अॅलेक्स हेल्स : ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम : 25 अर्धशतके
जेम्स विन्स : रोझ बाउल, साउथहॅम्प्टन : 24 अर्धशतके
तमीम इक्बाल : शेर-ए-बांगला, ढाका : 23 अर्धशतके
जेसन रॉय : द ओव्हल, लंडन : 21 अर्धशतके
आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही, पण त्यानंतर त्याने हळूहळू वेग पकडला आणि आता तो पुन्हा लयीत आला आहे. त्याच्या बॅटमधून खूप धावा येत आहेत. तो आरसीबीच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीने 9 सामन्यांत 392 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
राजस्थानविरुद्ध विराट कोहलीच्या 70 धावांच्या खेळीमुळे आरसीबी मजबूत स्थितीत पोहोचला. त्याची फलंदाजी पाहून संघाच्या प्लेऑफच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. जर कोहली असाच खेळत राहिला तर यावेळी आरसीबी जेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार बनू शकतो.
कोहलीची आयपीएल कारकीर्दही खूप चमकदार राहिली आहे. तो 2008 पासून आरसीबीसाठी खेळत आहे आणि आतापर्यंत 261 सामन्यांमध्ये त्याने 8296 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 8 शतके आणि 60 अर्धशतके आहेत. विशेष म्हणजे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.