Virat Kohli India Vs South Africa 3rd ODI: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी संघातील दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबाबत अन् वर्ल्डकप संघातील त्यांच्या समावेशाबाबत खूप चर्चा सुरू होती. मात्र रांची इथं झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीनं धडाकेबाज शतक ठोकलं, रोहितनेही अर्धशतकी खेळी करत टीकाकारांची तोंडे बंद केली.
विराटच्या य शतकी दणक्यामुळं तिसरा वनडे सामना होणाऱ्या विशाखापट्टणमच्या स्टेडियमला देखील फायदा झाला. या शतकानंतर आंध्र प्रदेश क्रिकेटचे ADA-VDCA स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्याची सर्व तिकीटे बूक झाली आहेत. स्टेडियमबाहेर हाऊस फुलचा बोर्ड लागला आहे.
विराट कोहली हा जगातील सर्वात चांगला क्राऊड पूलर क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू असतानाही तिसऱ्या वनडे सामन्याची सर्व तिकीटे बूक झाली आहेत. सर्व तिकीटे विकली जाण्यामागे विराट कोहली हे देखील मोठं कारण आहे.
विराट कोहलीने रांची आणि रायपूर सामन्यात पाठोपाठ शतकी खेळी केली. त्यानंतर आता तिसरा सामना हा विशाखापट्टणम इथं होणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिसऱ्या वनडे सामन्याची तिकीट विक्री सुरूवातीच्या टप्प्यात अत्यंत संथ गतीनं सुरू होती.
मात्र रांचीमध्ये विराट कोहलीनं शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या फेजमधील तिकीट विक्री वेगाने वाढली. या शतकानं सगळं बदलून टाकलं. विशाखपट्टणममध्ये विराट कोहलीचं रेकॉर्ड जबरदस्त असल्याचं आंध्र क्रिकेट असोसिएशनचे मीडिया टीमचे मेंबर वाय, व्यंकटेश यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील तिकीटे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध झाली ती मिनिटात संपली.'
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. ३५८ धावा करूनही दक्षिण अफ्रिकेनं टीम इंडियाचा सहज पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी खेळी केली. तर केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.
टीम इंडियानं पहिल्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला होता. आता मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.