Vaibhav Suryavanshi India Debut
मुंबई: आयपीएल 2026 मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने वैभव सूर्यवंशीने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या वादळी कामगिरीमुळे आता तो भारतीय क्रिकेट संघात विशेषतः टी-20 क्रिकेटमध्ये कधी दिसणार, याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी उत्तर दिले आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, निवड समिती नवीन प्रतिभेवर बारीक लक्ष ठेवून आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "वैभव सूर्यवंशीने आता कुठे आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. आमचे पाचही निवडकर्ते प्रत्येक आयपीएल सामन्याला प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करत आहेत. एखादी नवीन प्रतिभा समोर येत असेल, तर ती निवड समितीच्या नजरेतून सुटू नये, असा आमचा प्रयत्न आहे."
भारतीय संघात नवीन खेळाडूंच्या एन्ट्रीवर भाष्य करताना सैकिया म्हणाले, "ही खूप चांगली बाब आहे की, भारतीय क्रिकेट संघात आधीच उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आता वैभव सूर्यवंशी सारखे नवीन खेळाडूही आपला प्रभाव पाडत आहेत. आयपीएल लिलावातही फ्रँचायझींनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून ते शानदार कामगिरी करत आहेत. हे भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे."
देवजीत सैकिया यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, बीसीसीआय वैभवसारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेत आहे. वैभव सूर्यवंशीने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत १० डावांत ४० पेक्षा जास्त सरासरीने आणि २३७ च्या स्ट्राइक रेटने एकूण ४०४ धावा केल्या आहेत. सध्या तो 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत टॉप-५ मध्ये कायम आहे.