Sourav Ganguly On Gautam Gambhir pudhari
स्पोर्ट्स

Sourav Ganguly On Gautam Gambhir: गौतम गंभीरची खरी परीक्षा अजून बाकी.... वनडे वर्ल्डकपपूर्वी सौरव गांगुलीने दिला इशारा

Anirudha Sankpal

Sourav Ganguly Warning To Gautam Gambhir: भारताने टी २० वर्ल्डकप २०२६ वर आपलं नाव कोरल्यानंतर संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताने सलग दोन टी २० वर्ल्डकप जिंकले आहेत. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीवर देखील नाव कोरलं आहे. यामुळं गौतम गंभीरचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मात्र गौतम गंभीरची खरी परीक्षा अजून बाकी आहे असं म्हणत एकप्रकारे इशाराच दिला.

वर्ल्डकप दक्षिण अफ्रिकेत आहे

सौरव गांगुलीने एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट केलं की गौतम गंभीरची खरी परीक्षा ही २०२७ चा वनडे वर्ल्डकप असेल. हा वर्ल्डकप दक्षिण अफ्रिकेत होणार आहे.

गौतम गंभीर भारताचा कोच झाल्यापासून भारतानं दोन आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं नाव कोरलं. त्यानंतर २०२६ मध्ये टी २० वर्ल्डकप जिंकला.

तिथं गंभीरची खरी परीक्षा

भारताने अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत टी २० वर्ल्डकप जिंकला. यानंतर गांगुलीने एका मुलाखतीत सांगितलं की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गौतम गंभीरची खरी परीक्षा ही दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये असेल. तिथली प्लेईंग कंडीशन त्यांची परीक्षा घेईल. मात्र मला विश्वास आहे की ते ज्या संघासोबत काम करत आहेत तो संघ योग्य रिझल्ट देईल.

भारताचा २०२३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये स्वप्नभंग झाला होता. आता विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी देखील हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळं दबाव जास्त असणार आहे.

कसोटीतील कामगिरी सुधारणे गरजेचे

गांगुली म्हणाला की, गंभीरला कसोटी क्रिकेटमध्ये देखील आपली कामगिरी चांगली करण्याची गरज आहे. घरच्या मैदानावर खेळताना टर्निंग खेळपट्ट्यांऐवजी चांगल्या खेळपट्ट्या करायला हव्यात. चांगल्या खेळपट्ट्यांवर चांगले रिझल्ट मिळतात. इंग्लंड मालिकेचे उदाहर देत खेळपट्ट्यांबाबत जास्त विचार करणे फायदेशीर नाही असं सांगितलं.

गांगुलीने गंभीरचे समर्थन देखील केले. तो म्हणाला की, गंभीर एक चांगला कोच आहे आणि त्याला वेळ दिला गेला पाहिजे. गांगुलीच्या मते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गंभीरची रणनिती प्रभावी राहिली आहे. त्यांच्याजवळ एक चांगली मजबूत टीम देखील आहे.

गौतम गंभीरने जुलै २०२४ मध्ये राहुल द्रविडकडून भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हातात घेतली होती. त्याच्या कार्यकाळात भारतानं २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ चा टी २० वर्ल्डकप या दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. गौतम गंभीर २०२७ पर्यंतच्या वनडे वर्ल्डकपपर्यंत भारताचा कोच असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT