पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा. Pudhari
स्पोर्ट्स

Salman Agha on Ind vs Pak | "मी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये..." : 'हँडशेक' वादावर पाकच्या कर्णधाराने नेमकं काय म्हटलं?

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमारने टाळला होता 'हँडशेक'

पुढारी वृत्तसेवा

Salman Agha on Ind vs Pak

इस्‍लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून, चाहत्यांसाठी ती मैदानावरील 'युद्धसदृश' स्थिती असते. चाहत्यांच्या भावना आणि राष्ट्रीय अस्मिता या सामन्यांशी जोडलेली असते. सीमेवरील तणावाचे सावट अनेकदा खेळपट्टीवरही जाणवते. दोन संघांमधील प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक कृती जगभरात चर्चेचा विषय ठरते. गेल्या वर्षीच्या आशिया चषक स्पर्धेत अशाच काही घटना घडल्या होत्या, ज्या आजही त्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय भावना लक्षात घेऊन भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने घेतलेली भूमिका ठाम होती. मात्र, आता पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने या 'हँडशेक' (हस्तंदोलन) वादावर सविस्तर माहिती दिली आहे.

'त्या' दिवशी टॉसपूर्वी काय घडले?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सलमान अली आगाने म्हटलं आहे की, "मी टॉससाठी गेलो होतो. त्यापूर्वी पत्रकार परिषद झाली. तिथे हस्तांदोलन झाले, ट्रॉफीचे शूट झाले. जेव्हा मी टॉससाठी जात होतो, तेव्हा मी अगदी सामान्य होतो. मला कल्पना होती की, परिस्थिती फारशी सामान्य नसेल, पण 'हँडशेक' (हस्तांदोलन) होणार नाही हे मला माहित नव्हते."

मॅच रेफरीने आगाला काय सांगितले?

"आमचे मीडिया मॅनेजर नईम भाई यांच्यासोबत मी टॉससाठी गेलो. मॅच रेफरीने मला बाजूला नेले आणि सांगितले की, 'आपण हे अशा पद्धतीने करणार आहोत. इथे हस्तांदोलन होणार नाही, कृपया याची नोंद घ्या.' मी म्हणालो, 'ठीक आहे.' अशा प्रकारे त्यांनी मला आधीच कल्पना दिली होती," असेही आगाने म्हटलं आहे.

मी पाकिस्तानी संघाला घेऊन भारतीय ड्रेसिंग रूमकडे गेलो होतो...

हा सामना भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे सहज जिंकला. सामन्यापूर्वी हस्तांदोलन होणार नाही हे आगाला समजले होते, मात्र सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये हस्तांदोलन होईल असे त्याला वाटले होते. त्याने खुलासा केला की, तो संपूर्ण पाकिस्तानी संघाला घेऊन भारतीय ड्रेसिंग रूमकडे गेला होता, पण तिथला दरवाजा बंद होता. "सामना संपला, आम्ही हरलो होतो. आम्ही हस्तांदोलनासाठी त्यांच्या पॅव्हेलियनकडे जात होतो, पण तरीही त्यांनी हस्तांदोलन केले नाही."

मला हे योग्य वाटत नाही

"मी हे अनेकदा बोललो आहे, मला हे योग्य वाटत नाही. कारण आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो, लोक माझ्याकडे बघतात आणि मुले यातूनच शिकतात. असा प्रकार एखाद्या क्लब मॅचमध्ये घडला, तर त्याला मी कारणीभूत असेन कारण मी सुद्धा याचा भाग आहे. जेव्हा तुम्ही आदर्श असता, तेव्हा अशा गोष्टी करणे योग्य नाही," अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलन झालेले नाही. २०२५ च्या आशिया चषक फायनलमध्येही भारत-पाकिस्तान आमनेसामने आले होते, पण तिथेही दोन्ही संघांमध्ये कोणताही मैत्रीपूर्ण संवाद किंवा हावभाव दिसले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT