स्पोर्ट्स

Ravi Shastri On Shubman Gill's Captaincy : ‘पराभवाने खचू नका, गिलला कर्णधार म्हणून वेळ द्या’ : शास्त्री गुरुजींचा मोलाचा सल्ला

रणजित गायकवाड

shubman gill captain for 3 years even if we lose in england says ravi shastri

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाला आपला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. इंग्लंड दौऱ्यातील पराभवानंतरही गिलला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी संघ व्यवस्थापनाला दिला आहे. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

रवी शास्त्री यांच्या मते, एका पराभवाने कर्णधाराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. गिलला कर्णधार म्हणून स्थिरावण्यासाठी आणि आपला संघ घडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यांनी स्पष्ट केले की, जरी संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका गमावली, तरी गिलवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात गिलने अत्यंत प्रभावीपणे केली. कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावत त्याने एक विशेष विक्रम आपल्या नावे केला. असा पराक्रम करणारा तो केवळ पाचवा भारतीय कर्णधार ठरला. तथापि, त्याची ही शतकी खेळी संघाच्या कामी येऊ शकली नाही. इंग्लंडने चौथ्या डावात 371 धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीपणे पार करत भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर, शास्त्रींच्या विधानामुळे गिलच्या कर्णधारपदाच्या भविष्याविषयीच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

‘शुभमन गिल आता खूप परिपक्व झाला आहे. माध्यमांना सामोरे जाण्याची त्याची पद्धत, पत्रकार परिषदांमधील आणि नाणेफेकीच्या वेळची त्याची देहबोली व संवादकौशल्य यातून त्याची प्रगल्भता दिसून येते. त्याला तीन वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा. मालिकेचा निकाल काहीही लागो, कर्णधारपदाबाबत कोणताही बदल करू नका. त्याच्यावर तीन वर्षे विश्वास ठेवा आणि मला खात्री आहे की तो संघाला अपेक्षित यश मिळवून देईल,’ असे स्पष्ट मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

याशिवाय, गिलमध्ये भविष्यातील महान खेळाडू बनण्याचे सर्व गुण असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याला केवळ अनुभवानुसार परिस्थितीशी जुळवून घेण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

शास्त्री पुढे म्हणाले, ‘गिलने भविष्यात मोठी उंची न गाठल्यास मला निश्चितच निराशा होईल. त्याच्या फलंदाजीत एक राजेशाही थाट दिसतो. जर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनुभवातून शिकला आणि विविध परिस्थितींमध्ये स्वतःला जुळवून घेऊ शकला, तर मला त्याच्यात भविष्यातील एक महान खेळाडू निश्चितपणे दिसतो,’ असा विश्वास व्यक्त केला.

एजबॅस्टनवर भारतीय संघासमोर इतिहासाचे आव्हान

दरम्यान, लीड्स कसोटीत भारताच्या पराभवानंतर अनेक क्रीडा तज्ज्ञांनी सामन्यादरम्यान कर्णधार शुभमन गिलने वापरलेल्या मैदानी डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे, संघाला पुन्हा संघटित करून त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे आणि त्यांना दुसऱ्या कसोटीसाठी तयार करण्याचे मोठे आव्हान आता भारतीय कर्णधारासमोर आहे. दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर सुरू होणार आहे.

भारतासाठी एजबॅस्टनवरील आजवरची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही; येथे खेळलेल्या आठ सामन्यांपैकी सात सामन्यांत संघाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे, आगामी सामन्यात मालिका बरोबरीत आणण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणाऱ्या गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इतिहासाला आव्हान द्यावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT