IPL 2025 : भारताने ६-७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तान व पाक व्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ वेगवेगळ्या दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. या कारवाईला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव असून, ही मोहिम सुरुच असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
IPLभारतीय प्रीमियर लीग 2025 (आयपीएल) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, असे 'बीसीसीआय'च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी धर्मशाळा येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अर्धवट राहिला. त्यानंतर जम्मू आणि पठाणकोट येथे हवाई हल्ल्याचा इशारा दिला गेला. यामुळे यंदाचा आयपीएल हंगामाच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. दरम्यान, भारताने केलेल्या धडक कारवाईनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डनेही पाकिस्तान सुपर लीग युएईमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केले होते.
"देश युद्धाच्या स्थितीत असताना क्रिकेट सुरू ठेवणे योग्य दिसत नाही," असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. आयपीएलचा समारोप २५ मे रोजी कोलकातामध्ये होणार होता हे देखील स्पष्ट केले.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. यानंतर ६ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर ही माेहीम सुरुच राहणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे. गुरुवारी (दि. ८ मे) पठाणकोट, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, मोहाली (पंजाब) आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथे हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला असून, आता सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.