Mohammed Siraj got angry : न्यू चंदिगड येथील मुलानपूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाह यांच्यात मैदानावर जोरदार वादावादी पाहायला मिळाली. या कसोटी सामन्यावर भारताचे वर्चस्व राहिले. क्रिकेटच्या इतिहासातील भारताने आजवरचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
अफगाणिस्तानच्या पहिल्या डावातरहमत शाह हा शराफुद्दीन अश्रफसोबत फलंदाजी करत होता. शराफुद्दीनच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्याला धावताना त्रास होत होता. आपल्या सहकाऱ्याची ही अडचण पाहून रहमतने अत्यंत बचावात्मक पवित्रा घेतला, ज्यामुळे सिराज चांगलाच चिडला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रहमतने सिराजचा चेंडू अडवला. यानंतर फलंदाज क्रिजच्या आत सुरक्षित उभा असतानाही सिराजने आक्रमकपणे चेंडू थेट यष्ट्यांच्या (Stumps) दिशेने फेकला.
अगदी पुढच्याच चेंडूवर रहमतने ऑफ-साइडला आणखी एक सुरेख बचावात्मक फटका मारला, सिराजचा राग अनावर झाला. तो थेट रहमतच्या दिशेने चालत गेला आणि त्याला काही शब्द सुनावत 'काही चांगले फटके मारून दाखव' असे आव्हान दिले. सिराजचा हा आक्रमक पवित्रा भारतासाठी फायदेशीर ठरला. कारण काही षटकांतच भारताला यश मिळाले. पदार्पण करणाऱ्या मानव सुथारच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात शराफुद्दीन बाद झाला. त्यानंतर पुढच्या काही चेंडूंमध्येच सुथारने रहमत शाहलाही तंबूत पाठवले आणि सामन्यावर भारताचे पूर्ण नियंत्रण मिळवून दिले.
दरम्यान, पदार्पणाच्या सामन्यातच एकूण ७ बळी घेणाऱ्या मानव सुथारच्या फिरकीच्या जोरावर भारताने सोमवारी अफगाणिस्तानचा एक डाव आणि ३०० धावांनी धुव्वा उडवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारताने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला होता. न्यू चंदीगड येथे खेळवल्या गेलेल्या या एकमेव कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने ७ गडी बाद करत अफगाणिस्तानचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांवर गुंडाळला. तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावातील ५६४/८ (घोषित) धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावांवर आटोपला होता. डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने अवघ्या ३३ धावांत ६ बळी घेत भारताच्या या मोठ्या विजयाचा पाया रचला होता.
या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा रेकॉर्डब्रेक विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्ध एक डाव आणि २७२ धावांनी मिळवलेला विजय हा भारताचा सर्वात मोठा विजय होता, तो रेकॉर्ड आता मोडीत निघाला आहे.