MI vs KKR Toss Controversy IPL 2026: IPL 2026 च्या हंगामाची सुरुवात झाली आणि दुसऱ्याच सामन्यात वादाची ठिणगी पडली. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत दमदार विजय मिळवला. पण या विजयापेक्षा जास्त चर्चा रंगली ती टॉसच्या वेळी घडलेल्या घटनेची.
सामन्याच्या सुरुवातीलाच कॅप्टन हार्दिक पांड्या आणि अजिंक्य रहाणे टॉससाठी मैदानात उतरले. हार्दिकने नाणे उडवले आणि रहाणेने कॉल केला. मात्र नाणे खाली पडल्यावर नेमकं ‘हेड’ की ‘टेल’ होतं.. हे कॅमेऱ्यावर स्पष्टपणे दाखवलच नाही. काही सेकंदांतच थेट मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याची घोषणा करण्यात आली.
याच गोष्टीने वादाला तोंड फुटलं. सोशल मीडियावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केले. “असं नेहमी मुंबई इंडियन्सच्या सामन्यातच का होतं?” असा सवाल अनेकांनी केला. काहींनी तर थेट “टॉस फिक्सिंग”चा आरोपही केला. काहींच्या मते कॅमेऱ्याचा अँगल मुद्दाम बदलण्यात आला, त्यामुळे ‘हेड’ की ‘टेल’ हे स्पष्टपणे दिसलं नाही.
दरम्यान, हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, रहाणेनेही सांगितले की, त्यालाही आधी गोलंदाजी करायची होती. मात्र टॉसपूर्वीच तो वानखेडेच्या पिचबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दिसला.
वानखेडे स्टेडियम येथील पिचवर यावेळी जास्त गवत दिसत असल्याचे रहाणेने सांगितले. “मी यापूर्वी कधीही वानखेडेवर इतकं गवत पाहिलं नव्हतं. आम्ही सराव केलेल्या पिचेस यापेक्षा खूप वेगळ्या होत्या,” असे तो म्हणाला. पिचच्या या बदलामुळे सामन्याच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो, हेही स्पष्ट होतं.
सामन्याचा निकाल पाहता मुंबई इंडियन्सने मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला. पण या सामन्याची खरी चर्चा विजयापेक्षा टॉस आणि पिचवर होत आहे.
IPL सारख्या मोठ्या स्पर्धेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. अशा छोट्या घटनाही मोठा वाद निर्माण करू शकतात. त्यामुळे आयोजकांनी पुढील सामन्यांमध्ये अशा प्रकारच्या शंका निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. एकूणच, IPL 2026 च्या सुरुवातीलाच हा वाद क्रिकेटप्रेमींसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. आता पुढील सामन्यांमध्ये अशा घटना टाळल्या जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.