जसप्रीत बुमराह File photo
स्पोर्ट्स

Bumrah miss 2nd Test : बुमराह दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता! 'वर्कलोड'ने वाढवली चिंता

2 जुलैपासून एजबॅस्टनच्या मैदानावर सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाची धार काहीशी बोथट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रणजित गायकवाड

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि हुकमी एक्का, जसप्रीत बुमराह, याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निर्णय 'मास्टरस्ट्रोक' ठरणार की संघासाठी एक मोठी जोखीम?

वृत्तानुसार, बुमराहच्या कार्यभाराचे नियोजन (workload management) करण्याच्या पूर्वनिश्चित धोरणाचा भाग म्हणून संघ व्यवस्थापन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. 2 जुलैपासून एजबॅस्टनच्या मैदानावर सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाची धार काहीशी बोथट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, ही एक विचारपूर्वक केलेली रणनिती आहे की इंग्लंडच्या भूमीवर पत्करलेली मोठी जोखीम, हे पाहणे निर्णायक ठरेल. दरम्यान, पहिल्या कसोटीत केलेल्या भेदक माऱ्यानंतर आता बुमराहच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार आणि भारतीय संघ या आव्हानाला कसा सामोरा जाणार, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर राहिल्यानंतर अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या बुमराहने लीड्समधील पहिल्या डावात 24.4 षटके गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणात सहकाऱ्यांकडून वारंवार निराशा पदरी पडूनही, त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच बळी मिळवले. कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेण्याची त्याची ही 14 वी वेळ होती.

सुमार क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील इतर सहकाऱ्यांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे भारताला हेडिंग्ले कसोटी पाच गडी राखून गमवावी लागली. या सामन्यात बुमराहचे नियंत्रण आणि भेदक मारा विशेष उठून दिसला. मात्रदुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या मारा इंग्लंडच्या फलंदाजांनी निष्प्रभ केला.

बुमराहच्या गोलंदाजीवर तीन झेल सोडले

भारताच्या पहिल्या डावात बुमराहच्या गोलंदाजीवर एकूण तीन झेल सोडण्यात आले, ज्यामध्ये सलामीवीर हॅरी ब्रूकला तीनदा जीवदान मिळाले आणि अखेरीस तो 99 धावांवर बाद झाला.

हेडिंग्ले येथील पराभवानंतरही भारत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत सावध रणनीती अवलंबणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मालिकेपूर्वी स्पष्ट केले होते की, बुमराह सर्व पाच कसोटी सामने खेळणार नाही आणि त्याला विश्रांती देण्यासाठी रोटेशन धोरण अवलंबले जाईल.

‘जर आम्ही बुमराह आणि सिराजला वगळले, तर आमच्या गोलंदाजी पंक्तीत फारसा अनुभव शिल्लक राहत नाही. परंतु, नव्या खेळाडूंवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, कारण त्यांच्याकडे प्रतिभा आहे,’ असे गंभीर यांनी लीड्स येथील पराभवानंतर नमूद केले.

बुमराहच्या अनुपस्थितीमुळे चिंता वाढली

दुसरा सामना संपल्यानंतर केवळ चार दिवसांनी ऐतिहासिक लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना नियोजित असल्याने, संघ व्यवस्थापन मालिकेच्या पुढील टप्प्यासाठी बुमराहला जपण्याचा विचार करत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीमुळे आधीच संघर्ष करणाऱ्या गोलंदाजीच्या ताफ्यात एक मोठी पोकळी निर्माण होईल, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT