आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने आयोजित २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र पाकिस्तानमध्ये हाेणारे सामने खेळण्यास टीम इंडिया जाणार नाही. पाकिस्तानऐवजी दुबई किंवा श्रीलंका येथे सामने व्हावेत, अशी विनंती 'बीसीसीआय' 'आयसीसी'ला करेल, असे वृत्त ANIने 'बीसीसीआय' सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. गेल्या 8 वर्षांत एकदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते, पण ही स्पर्धा पुनरागमन करत आहे. पुढील वर्षी हाेणार्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान करत आहे. स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. मात्र पाकिस्तानने आपले प्रस्तावित वेळापत्रक तयार करून आयसीसीकडे पाठवले आहे. त्यामुळे लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च २०२५ या कालावधीत खेळली जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या सामन्यांच्या तारखाही समोर आल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतीक अव्वल 8 संघ सहभागी होणार आहेत. यात यजमान पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ पात्र ठरलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे, भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
भारतीय संघाच्या गट सामन्यांचे आयोजन लाहोरमध्ये करण्यात आले होते. तिन्ही साखळी सामने याच ठिकाणी होणार हाेते. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या लढतीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करणार हाेता. यानंतर 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडशी तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला 1 मार्चला खेळवला जाण्याची शक्यता हाेती.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तान जाणे कठीण दिसत आहे. या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. याशिवाय हे दोन्ही देश फक्त आशिया कप किंवा कोणत्याही आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. भारताने जवळपास 16 वर्षांपासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्याच वेळी, गेल्या वर्षी आशिया चषक देखील हायब्रीड मॉडेल अंतर्गत श्रीलंकेत खेळला गेला होता. आताही टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच लाहोर येथे टीम इंडियाचे हाेणारे सामने दुबई किंवा श्रीलंकेमध्ये खेळवले जावेत, अशी मागणी बीसीसीआयने केल्याने टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.