टीम इंडियाने नुकतेच T-20 विश्वचषकावर आपली मोहर उमटवली. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने T-20 मधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण फॉर्ममध्ये असताना त्याने घेतलेला निर्णय चाहत्यांसाठी अनपेक्षित होता. वन-डे फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा खेळणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. आता रोहित शर्माने याबाबत आपलं मौन सोडलं आहे.
रोहित शर्मा अमेरिकेतील डॅलस येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. या वेळी त्याला भविष्यातील योजनांबाबत विचारण्यात आले. यावर तो म्हणाले की, मी भविष्याचा जास्त विचार करणारा माणूस नाही. मी आधीच सांगितले आहे की, मी फार पुढचा विचार करणारी व्यक्ती नाही. मात्र येत्या काही काळासाठी तुम्ही मला खेळताना पाहाल, असेही त्याने स्पष्ट केले.
रोहित शर्माने क्रिकेटच्या T-20 फॉरमॅटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक पाच शतके ठोकण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघात रोहित सहभागी होता. आता त्याने त्याच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला आहे. रोहितसोबत विराट कोहलीनेही आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती घेतली होती. टी-20 मध्ये भारताला नवा कर्णधार मिळेल, पण रोहित वनडे आणि कसोटीत संघाचे नेतृत्व करत राहील.
टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला होता की, निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. हा माझा शेवटचा सामनाही होता. मी नेहमीच टी-20फॉरमॅटचा आनंद लुटला आहे. त्यातला प्रत्येक क्षण मला आवडला आहे.