स्पोर्ट्स

IND vs ENG Test Series History : इंग्लंडमध्ये ‘या’ 3 भारतीय कर्णधारांनीच जिंकली कसोटी मालिका, धोनी-कोहलीही पडले मागे

आतापर्यंत फक्त तीन भारतीय कर्णधारांना इंग्लंडच्या भूमीवर भारतासाठी कसोटी मालिका जिंकता आली आहे.

रणजित गायकवाड

India vs England Test Series History

आयपीएल 2025 संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करेल. तेथे उभय संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची जबाबदारी गिलच्या खांद्यावर असेल.

इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटी मालिका जिंकू शकले फक्त 3 कर्णधार

भारताने 1932 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर पहिला कसोटी सामना खेळला. त्यात टीम इंडियाचा 158 धावांनी पराभव झाला. त्यावेळी टीम इंडियाचे कर्णधार सीके नायडू होते. 1932 पासून, भारतीय संघाला इंग्लंडच्या भूमीवर फक्त तीन वेळा कसोटी मालिका जिंकता आली आहे. भारताने 1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली, 1986 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि 2007 मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची नावे समाविष्ट नाहीत.

1. अजित वाडेकर

1971 मध्ये, अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. भारतीय संघाने ही मालिका 1-0 ने जिंकली. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. यानंतर, भागवत चंद्रशेखर यांनी तिसऱ्या कसोटीत शानदार गोलंदाजी केली. त्यांनी त्या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.

2. कपिल देव

1986 मध्ये, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांनी प्रभावी कामगिरी केली. यामुळे इंग्लंडला पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात 179 धावांनी पराभव पत्करावा लागला. तर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि टीम इंडियाने ती कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली.

3. राहुल द्रविड

2007 मध्ये, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. त्या मालिकेतील पहिला आणि तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात झहीर खान संघाचा सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. त्याने सामन्यात एकूण 9 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे, टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT