स्पोर्ट्स

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-अमेरिका सामना रंगणार

मोहन कारंडे

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : जगाच्या राजकारणात अमेरिका 'सुपर पॉवर' असली, तरी जागतिक क्रिकेटमध्ये भारत 'पॉवरबाज' आहे. या दोन पॉवरफुल्ल देशांमध्ये आज टी-२० वर्ल्डकपचा सामना होणार आहे. भारत या सामन्यात हॉट फेव्हरिट असला, तरी नवख्या अमेरिकेने पाकिस्तानला हरवले असल्याने भारत त्यांना हलक्यात घेणार नाही. या विश्वचषकात आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा भारताचा प्रयत्न असेल. हा सामना जिंकणारा संघ 'अ' गटातून सुपर-८ फेरी गाठणार आहे.

जर दोन्ही देशांमधील हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडेल; पण या सामन्यात टीम इंडिया जिंकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. खराब फॉर्म असलेल्या शिवम दुबेला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. दुबेला वगळून यशस्वी जैस्वालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. जर तो संघात आला, तर तो रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल. कारण, विराट कोहली गेल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. पहिल्या सामन्यात तो आयर्लंडविरुद्ध एक धाव काढल्यानंतर आणि पाकिस्तानविरुद्ध ४ धावा केल्यानंतर बाद झाला होता. सध्या तरी संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. यशस्वीची एंट्री झाल्यास कोहली त्याच्या जुन्या स्थानावर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि यशस्वीच्या आगमनाने भारताला डावे-उजवे कॉम्बिनेशन मिळेल.

बॉलिंग युनिटमध्ये होणार नाही बदल

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत असून, हार्दिक पंड्याही त्यांना साथ देत आहे, त्यामुळे हे सर्वजण संघात राहतील. अक्षर पटेलने स्वतःला सिद्ध केले असले, तरी रवींद्र जडेजाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पाकिस्तानविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला होता; पण त्याला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता नाही. या स्थितीत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना प्रतीक्षा करावी लागू शकते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT