![खेळाडूंना घरी बसवण्याची वेळ; अक्रमचा संताप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-233.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने सहा धावांनी बाजी मारली. भारतीय संघाने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवल्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने संताप व्यक्त केला. या खेळाडूंना घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका त्याने पाकच्या संघ व्यवस्थापनासह खेळाडूंवर केली.
'स्टार स्पोर्टस्'वर सामन्याचे विश्लेषण करताना वसीम अक्रमने आपल्या संघाला घरचा आहेर दिला. तो म्हणाला की, पाकिस्तानच्या संघातील खेळाडू मागील 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत. मोहम्मद रिझवानला खेळाबद्दल काहीच माहिती नाही का? त्याला समजायला हवे होते की, जसप्रीत बुमराहला बळी घेण्यासाठीच गोलंदाजीला आणले होते. तेव्हा त्याने सावध राहायला हवे होते. पण, मोठा फटका मारण्याच्या नादात रिझवान तंबूत परतला. इफ्तिखार अहमदने देखील हेच केले.
हे असे खेळाडू आहेत जे एकमेकांसोबत जास्त चर्चा करत नाहीत. पाकिस्तानच्या खेळाडूंना शत्रूची गरज भासत नाही. कारण की ते स्वत:च त्यांचे शत्रू आहेत. जेव्हा तुम्ही 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असता तेव्हा स्ट्राईक रोटेट करण्याची गरज असते. अशावेळी खराब चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण, पाकिस्तानी संघाकडे कोणती रणनीतीच नसल्याने पराभव स्वीकारावा लागला, असेही वसीम अक्रमने सांगितले.