IND vs PAK Shoaib Akhtar U Turn on Mohsin Naqvi After Ignorant Remark
इस्लामाबाद : टी-२० विश्वचषकात भारताकडून ६१ धावांनी पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना थेट ‘अकार्यक्षम’ आणि ‘अडाणी’ म्हणणाऱ्या शोएब अख्तरने आता अवघ्या २४ तासांत आपली भूमिका बदलली आहे. नक्वी हे शक्तिशाली आहेत, पण त्यांना योग्य सल्ला दिला जात नसल्याचा दावा करत अख्तरने आता सारवासारव सुरू केली आहे.
रविवारी (दि. १५) झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात नऊ भेटींपैकी पाकिस्तानचा हा आठवा पराभव होता. या पराभवामुळे २००९ चा विजेता संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या परिस्थितीमुळे संतापलेल्या शोएब अख्तरने एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना पीसीबी प्रशासनावर कडाडून टीका केली होती.
अख्तर म्हणाला होता की, ‘जगातील सर्वात मोठा गुन्हा म्हणजे एखाद्या अकार्यक्षम व्यक्तीच्या हातात मोठी जबाबदारी सोपवणे. जेव्हा एखादी अकार्यक्षम आणि अडाणी व्यक्ती मोठ्या पदावर बसते, तेव्हा गोंधळ आणि नुकसान होणे अटळ असते.’
मात्र, ही टीका अंगलट येत असल्याचे पाहून अख्तरने दुसऱ्याच दिवशी कोलांटीउडी घेतली. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचा दावा त्याने केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यम 'एआरवाय न्यूज'शी बोलताना तो म्हणाला, ‘माझी टिप्पणी मोहसीन नक्वी यांच्याबद्दल नव्हतीच. अकार्यक्षमतेचा उल्लेख मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी केला होता. काही भारतीय वाहिन्यांनी माझ्या शब्दांचा विपर्यास केला. उलट, मी त्याच कार्यक्रमात लोकांना विनंती केली होती की नक्वी यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोलू नका, कारण ते मी खपवून घेणार नाही.’
अख्तरने आता नक्वींची बाजू सावरताना म्हटले की, ‘नक्वींना पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा करायची आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ते उत्तम व्यक्ती आहेत आणि त्यांना चांगले काम करायचे आहे. दुर्दैवाने त्यांना योग्य सल्ला दिला जात नाही. ते पाकिस्तान क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत, परंतु संघ निवडीसाठी ते योग्य लोकांची निवड करत नाहीत,’ असेही अख्तरने नमूद केले.
दुसरीकडे, पाकिस्तान संघाचा पुढील प्रवास खडतर झाला आहे. बुधवारी (दि. १८) कोलंबोतील एसएससी स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना नामिबियाशी होणार आहे. 'सुपर ८' मधील स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.