स्पोर्ट्स

India Lord's Test Defeat : ‘लॉर्ड्स’वरील भारताच्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख 5 कारणे, जाणून घ्या आकडेवारी

इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाला 193 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. हा सामना अत्यंत चढ-उतारांनी भरलेला होता.

रणजित गायकवाड

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघ 193 धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि चौथ्या दिवसापर्यंत विजयाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकेल, याचा अंदाज लावणे कठीण होते. तथापि, भारताचे 58 धावांवर 4 गडी बाद झाल्याने इंग्लंडचे पारडे जड झाले होते. के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासारखे फलंदाज संघात असल्याने भारताच्या आशा कायम होत्या, परंतु पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात 4 गडी बाद झाल्याने या आशा धुळीस मिळाल्या. यानंतर रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या साथीने उत्तम फलंदाजी केली, परंतु चहापानानंतर भारताला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. चला जाणून घेऊया भारताच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे..

पहिल्या डावात आघाडी घेण्यात अपयश

पहिल्या डावात आघाडी घेण्यात अपयश भारताचा पराभव पाचव्या दिवशी झाला असला तरी, पहिल्या डावात आघाडी घेण्यात अपयशी ठरल्याने संघ त्याच वेळी पिछाडीवर गेला होता. लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. अशा परिस्थितीत, चौथ्या डावात कोणत्याही संघासाठी कोणतेही लक्ष्य सोपे नसते. जर भारताने पहिल्या डावात 25-30 धावांची जरी आघाडी घेतली असती, तरी त्याने सामन्यात मोठा फरक पडला असता. भारताला आघाडी घेता आली नसती असे नाही, परंतु संघाने पहिल्या डावातील शेवटचे 4 गडी केवळ 11 धावांत गमावले.

ऋषभ पंतचे खराब पद्धतीने धावबाद होणे

पहिल्या डावात ऋषभ पंत आणि के. एल. राहुल यांच्यात 141 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती. तिसऱ्या दिवशी उपाहाराच्या ठीक आधी ही भागीदारी संपुष्टात आली. उत्तम फलंदाजी करणारा पंत धावबाद झाला. बेन स्टोक्सच्या अचूक फेकीमुळे त्याला तंबूत परतावे लागले. पंतने 74 धावा केल्या होत्या. त्याने आणखी काही काळ फलंदाजी केली असती, तर भारत निश्चितपणे पहिल्या डावात आघाडी घेण्यात यशस्वी ठरला असता.

जेमी स्मिथचा सुटलेला झेल

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथने पहिल्या डावात 51 धावा केल्या. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये के. एल. राहुलने त्याचा झेल सोडला. त्यावेळी स्मिथ केवळ 1 धावेवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा घेत त्याने आणखी 50 धावांची भर घातली. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 355 पर्यंत पोहोचली होती.

63 अतिरिक्त धावा

भारतीय संघाला 63 अतिरिक्त धावा निश्चितच महाग पडल्या. इंग्लंडला पहिल्या डावात 31 अतिरिक्त धावा मिळाल्या, ज्यात 11 बाय, 12 लेग बाय, 5 वाइड आणि 2 नोबॉल यांचा समावेश होता. दुसऱ्या डावात इंग्लंडला 32 अतिरिक्त धावा मिळाल्या, ज्यात 25 बाय, 6 लेग बाय आणि 1 नोबॉल होता.

जडेजाचा संथ खेळ

भारतीय संघाने दुसऱ्या डावात आपला आठवा गडी 39व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गमावला. यानंतर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी 132 चेंडूंत 35 धावांची भागीदारी केली. या दरम्यान जडेजाने मोठे फटके मारण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. बुमराहने 54 चेंडूंचा सामना केला. जर जडेजाने धावा काढण्याचा अधिक प्रयत्न केला असता, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. त्याने मोहम्मद सिराजसोबत 80 चेंडूंत 23 धावांची भागीदारी केली, मात्र तो अखेरपर्यंत नाबाद राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT