Pakistan Cricket Board on T20 World Cup 2026
नवी दिल्ली : ICC पुरुष टी 20 विश्वचषकास अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणार्या स्पर्धेसाठी संघाची तयारी थांबवली आहे. बांगलादेशने भारतात खेळण्यास बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील 'जिओ न्यूज'ने म्हटले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याबाबत कोणतेही पुष्टी करणारे कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्देशानुसार बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला कोलकाता नाइट रायडर्सच्या (केकेआर) आयपीएल २०२६ संघातून वगळण्यात आले. यानंतरबांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आपल्या खेळाडूंच्या "सुरक्षिततेच्या आणि संरक्षणाच्या" चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) त्यांचे सामने भारताबाहेरील ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे.
बांगलादेशच्या सुरक्षाविषयक चिंतांना "वाजवी आणि वैध" ठरवत, पाकिस्तानने १९ जानेवारी रोजी टी२० विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी भारतात न जाण्याच्या बीसीबीच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतल्यास पर्यायी योजना तयार करण्यास पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापनाला सांगण्यात आले आहे. बांगलादेशचा प्रश्न न सुटल्यास टी२० विश्वचषकातील सहभागावर पुनर्विचार करू, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
श्रीलंकेतील ठिकाणे उपलब्ध नसल्यास बांगलादेशचे टी२० विश्वचषकाचे सामने आयोजित करण्याची तयारीही पीसीबीने व्यक्त केली आहे.दरम्यान, आयसीसी आपल्या मूळ वेळापत्रकात कोणताही बदल न करण्यावर ठाम आहे, ज्यामध्ये बांगलादेशला इटली, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि नेपाळसोबत गट सी मध्ये ठेवण्यात आले आहे.
या प्रश्नी आयसीसी आणि बीसीबी यांच्यात दोन बैठका झाल्या आहेत, परंतु हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, आणि टी२० विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले अहो. आयसीसीच्या सूत्रांनुसार, क्रिकेटच्या जागतिक नियामक संस्थेने बीसीबीला आगामी आयसीसी विश्वचषकासाठी बांगलादेश क्रिकेट संघ भारतात पाठवणार की नाही, याबाबत २१ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय देण्याचा अल्टिमेटम दिला होता. बीसीबीने आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला, तर आयसीसी पर्यायी संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे आणि सध्याच्या क्रमवारीनुसार, तो संघ स्कॉटलंड असू शकतो.
बांगलादेश आपला टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ते ९ फेब्रुवारी रोजी त्याच मैदानावर इटलीचा सामना करतील, त्यानंतर कोलकाता येथे २०२२ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या इंग्लंडविरुद्ध खेळतील आणि १७ फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्याने साखळी सामन्यातील मोहिमेचा समारोप करेल.
दुसरीकडे, पाकिस्तानला भारत, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया यांच्यासोबत गट 'अ' मध्ये ठेवण्यात आले आहे आणि ते ७ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहेत. त्यांचा सामना १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भारताविरुद्ध होणार आहे.