Rishabh Pant Delhi Capitals return : दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कर्णधार अक्षर पटेलने स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचे संघात पुन्हा एकदा मनःपूर्वक आणि मजेशीर अंदाजात स्वागत केले आहे. एका मोठ्या आणि धमाकेदार आयपीएल ट्रेड (खेळाडूंची अदलाबदल) डील अंतर्गत पंतचे दिल्ली संघात पुनरागमन झाले आहे.
रिषभ पंत १५ कोटी रुपयांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोडून आपल्या जुन्या घरी म्हणजेच दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. या हाय-प्रोफाइल ट्रेडनंतर, दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अक्षर पटेलने ही डील फायनल झाल्यानंतर पंतसोबत झालेल्या पहिल्या संभाषणाचा खुलासा केला.
अक्षरच्या सांगण्यानुसार, ही आनंदाची बातमी देण्यासाठी पंत त्याला वारंवार फोन करत होता; पण अक्षर आपल्या मुलासोबत वेळ घालवत असल्याने सुरुवातीला त्याचे फोन मिस झाले. अक्षरने उलट फोन केला, तेव्हा उत्साही पंतने लगेचच बातमीला दुजोरा दिला आणि म्हणाला, “कन्फर्म हो गया भाई, मैं वापस आ रहा हूँ” (भावा, नक्की झालंय, मी परत येतोय). यावेळी अक्षरने सांगितले की, एक गोष्ट त्याला पंतला सांगायची होती, पण फोनवर तो सांगू शकला नाही. व्हिडिओमध्ये त्याने एका प्रसिद्ध हिंदी म्हणीचा वापर करत पंतचे मजेशीर स्वागत केले:“सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते।” (एखादी व्यक्ती सकाळी रस्ता चुकली आणि संध्याकाळी घरी परत आली, तर त्याला भरकटलेला म्हणत नाहीत.)
मागील मेगा लिलावात (Mega Auction) लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतला २७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केले होते. मात्र, संमिश्र कामगिरी आणि संघाच्या बदलत्या रणनीतीमुळे दोन्ही फ्रँचायझींनी आयपीएल २०२७ (IPL 2027) च्या हंगामापूर्वी थेट खेळाडूंची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली कॅपिटल्ससोबतची पहिली खेळी (२०१६ ते २०२४): पंतने नऊ हंगामात तब्बल ३,२८४ धावा केल्या. तो या फ्रँचायझीसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. लखनऊ सुपर जायंट्ससोबतचा दोन वर्षांच्या या प्रवासात पंतने २८ सामन्यांत ५८१ धावा केल्या. लखनऊचा कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने १० विजय मिळवले तर १८ सामन्यांत पराभव पत्करावा लागले होते.