Asia Cup 2025 Controversy : आशिया कप २०२५ नंतर निर्माण झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक विशेष समिती स्थापन केली आहे. टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, ओमान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पंकज खिमजी हे या समितीचे अध्यक्ष असतील. खिमजी हे दोन्ही क्रिकेट बोर्डांचे जवळचे मानले जातात आणि त्यांनी यापूर्वी अनेक वादांमध्ये मध्यस्थी केली आहे. बीसीसीआयने आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर आयसीसीने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. बक्षीस वितरण सोहळ्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी विजेत्या भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी देण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमारने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. कारण नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री असल्याने आणि त्यांनी भारतात दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेण्यात आले होते. तर मी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष असल्याने मलाच विजयी संघाला ट्रॉफी देण्याचा अधिकार आहे, असा हेक्का नक्वी यांनी कायम ठेवला. त्यानंर सूर्यकुमार यादवने ट्रॉफी न स्वीकारता विनोदाने "काल्पनिक ट्रॉफी" धरून आपल्या सहकाऱ्यांसह आनंद साजरा केला.
मोहसिन नक्वी यांनी नंतर १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या समारंभात बीसीसीआयला ट्रॉफी स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला, परंतु बीसीसीआयने नकार दिला. तसेच आयसीसी बोर्डाच्या बैठकीत औपचारिकपणे हा मुद्दा उपस्थित केला. सूत्रांनी म्हटलं आहे की, या बैठकीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सारख्या बोर्डांनी दोन्ही देशांना शांत करण्याचा प्रयत्न केला." ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी त्यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यास सहमती दर्शविली.
पाकिस्तान क्रिकेट प्रमुख मोहसिन नक्वी यांनीही बैठकीत भाग घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "चर्चा दरम्यान कोणताही कटुता नव्हता. आयसीसी बोर्डाने यावर सहमती दर्शवली की,भारत आणि पाकिस्तान हे दोघेही क्रिकेट जगतातील महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यांनी आपआपसातील मतभेद सोडवले पाहिजेत. आता मध्यस्थीची संपूर्ण जबाबदारी ओमान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पंकज खिमजी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दोन्ही देशांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा वाद शांततेत सोडवला जाईल, अशा आशावाद आयसीसीने व्यक्त केला आहे.