Abhishek Sharma T20 series: फगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. शेर-ए-पंजाब टी-20 लीगच्या पहिल्याच सामन्यात अभिषेकने अवघ्या 26 चेंडूंत 77 धावांची वादळी खेळी केली.
30 ऑगस्ट रोजी मोहालीतील पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर अमृतसर सूरमाजकडून खेळताना अभिषेकने तब्बल 296.15 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. अभिषेकच्या या आक्रमक खेळीमुळे अमृतसर सूरमाजने 19.5 षटकांत 258 धावांचा डोंगर उभा केला.
मात्र, एवढी मोठी धावसंख्या उभारूनही अमृतसरला सामना जिंकता आला नाही. मोहाली किंग्सने 259 धावांचे लक्ष्य 19.3 षटकांत 5 विकेट्स राखून गाठले.
अभिषेक शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 17 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या सहज धवनने 18 चेंडूंत 45 धावा केल्या. त्यानंतर नमन धीरनेही 22 चेंडूंत 47 धावांची तुफानी खेळी केली. नमनच्या खेळीत 5 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
अमृतसर सूरमाजने 258 धावांची मोठी धावसंख्या उभारल्यानंतर सामना त्यांच्या हातात असल्याचे दिसत होते. मात्र, मोहाली किंग्सच्या अनमोलप्रीत सिंहने संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले.
अनमोलप्रीतने अवघ्या 51 चेंडूंत 133 धावांची वादळी खेळी केली. त्याने 10 चौकार आणि तब्बल 12 षटकार ठोकले. कर्णधार रमनदीप सिंहनेही नाबाद 69 धावांची खेळी करत त्याला साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी केवळ 70 चेंडूंत तब्बल 151 धावांची भागीदारी केली. त्यामुळे मोहाली किंग्सने 19.3 षटकांत 259 धावा करत अमृतसर सूरमाजवर पाच विकेट्सने विजय मिळवला.
फलंदाजीत धुमाकूळ घातल्यानंतर अभिषेक शर्माने गोलंदाजीतही योगदान दिले. त्याने मोहालीच्या डावातील पहिले षटक टाकले आणि चौथ्या चेंडूवर मनप्रीत जौहलला बाद केले. अभिषेकने 2.3 षटकांत 37 धावा देत एक विकेट घेतली.
अभिषेक शर्माची ही धडाकेबाज खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारताला 13 सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या या जबरदस्त कामगिरीमुळे अभिषेकने निवडकर्त्यांना आपली दावेदारी आणखी मजबूत असल्याचा मेसेज दिला आहे.
आता चाहत्यांचे लक्ष 1 सप्टेंबरच्या अमृतसर सूरमाज विरुद्ध जालंधर वॉरियर्स सामन्याकडे लागले आहे. जालंधर संघाचे नेतृत्व प्रभसिमरन सिंह करणार आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा आणखी एक स्टार फलंदाज शुभमन गिलही या लीगमध्ये फाजिल्का फाल्कन्सकडून खेळत आहे. फाजिल्का फाल्कन्सचा पहिला सामना 31 ऑगस्ट रोजी जालंधर वॉरियर्सविरुद्ध होणार आहे.