नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ च्या धामधुमीत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पोटातील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेला टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी त्याच्या प्रकृतीत झालेली सुधारणा भारतासाठी शुभसंकेत मानली जात असली, तरी तो अंतिम अकरामध्ये खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
भारतीय संघ गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद साधताना युवा फलंदाज तिलक वर्माने अभिषेकच्या प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तिलक म्हणाला, ‘अभिषेक शर्माला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो आता बरा आहे, परंतु नामिबिया विरुद्धच्या सामन्यात त्याच्या सहभागाबद्दलचा अंतिम निर्णय हा सामन्याच्या दिवशीच घेतला जाईल.’
नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ कोलंबोकडे रवाना होणार असून, तिथे जगाचे लक्ष लागून असलेला भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याबाबत विचारले असता तिलक वर्मा म्हणाला की, ‘संपूर्ण संघ या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. पाकिस्तानचा संघ खेळण्यासाठी तयार आहे ही बातमी मिळाल्यापासूनच आमच्यातील उत्साह द्विगुणित झाला असून आम्ही या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत.’
अभिषेक शर्मा हा भारतीय डावाच्या सुरुवातीलाच आक्रमक फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध तो शून्यावर बाद झाल्याने भारतीय संघ काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने चिवट खेळी करत संघाला सावरले आणि विजय मिळवून दिला. आता नामिबियाविरुद्धच्या सामन्यात अभिषेकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की त्याला विश्रांती दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.