India T20I Next Captain: भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नुकताच टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. मात्र सूर्यकुमार यादवचं वय पाहता आता त्याच्यानंतर पुढच्या वर्ल्डकपमध्ये संघाची धुरा कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भारताचा माजी सलमीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने काही बोल्ड प्रेडिक्शन केले आहेत. त्यानं मुंबईकर असलेला हा खेळाडू भारतीय टी २० संघात फक्त पुनरागमन करणार नाही तर तो टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार देखील होईल असं मत नोंदवलं आहे.
आकाश चोप्राने श्रेयस अय्यरला भारताचा पुढचा टी २० कर्णधार होण्याची संधी असल्याचं म्हटलं आहे. जर त्यानं आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले तर त्याला ही संधी मिळण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरला यंदाच्या टी २० वर्ल्डकप संघात स्थान मिळालं नव्हतं. तो २०२३ पासून आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून खेळतना दिसलेला नाही. असं असलं तरी आकाश चोप्राला वाटतं की अय्यर फक्त टी २० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही तर तो भारतीय संघाचा कर्णधार देखील होऊ शकतो.
आकाश चोप्रा आपल्या युट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत म्हणतो, जर अय्यरने यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचं नेतृत्व करताना आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं तर तो पुढचा भारताचा टी २० कर्णधार देखील असू शकतो. केकेआरचा माजी खेळाडू असलेला श्रेयस अय्यरला यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये संघात स्थान मिळवता आलेलं नव्हतं. मात्र आता भारतीय संघातील मधल्या फळीतील जागा रिकमी होण्याची शक्यता आहे. ती जागा अय्यर भरून काढण्याची शक्यता आहे.
चोप्रा पुढे म्हणाला, 'मला वाटतं की श्रेयस अय्यर भारताच्या टी२० संघात येऊ शकतो. मला असं वाटतं की मधल्या फळीतील जागा रिकामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अय्यर तिथं येऊ शकतो. जर त्याने कॅप्टन्सीवर पुन्हा दावा केला तर तो भारताचा पुढचा टी २० कर्णधार देखील होऊ शकतो. का नाही नक्कीच होऊ शकतो.'
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने गेल्या आयपीएल हंगामात पॉईंट टेबलमध्ये टॉप केलं होतं. त्यांनी १४ पैकी ९ सामन्यात विजय मिळवला होता तर ४ सामन्यात पराभव झाला होता. त्यांनी अंतिम फेरीत देखील धडक मारली होती. मात्र आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली होती. पंजाबचा फक्त ६ धावांनी पराभव झाला होता.
श्रेयसने २०२४ मध्ये केकेआरचा कर्णधार असताना आयपीएलचे विजेतेपद पटकावलं होतं. मात्र त्यानंतर अय्यरला रिलीज करण्यात आलं अन् तो पंजाब किंग्जकडून खेळू लागला. श्रेयसने मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व केले आहे.