

Surya Kumar Yadav Video: आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारताचा पहिलाच पराभव झाला. सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात तुल्यबळ दक्षिण अफ्रिकेने भारताला ७६ धावांनी मात दिली. या पराभवानंतर ग्रुप १ मधील सगळे चित्रच पालटले. भारताला आता पुढचे दोन्ही सामने जिंकण्यावाचून गत्यंतर नाही. आता टीम इंडियासाठी दोन्ही सामन्यात करो या मरोची स्थिती असणार आहे.
दक्षिण अफ्रिकेने भारतासमोर १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताला १८.५ षटकात फक्त १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्यानंतर पराभवाने कर्णधार सूर्यकुमार यादव हा जास्तच चिडला होता. कर्णधार सूर्यकुमार आणि सपोर्ट स्टाफमध्ये डग आऊटमध्ये दीर्घकाळ वाद सुरू होता. या सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील व्यवस्थपनानं रणनिती तयार केली होती. ती रणनिती फेल गेली. त्यामुळं सूर्याला राग येणं स्वाभाविक होतं. सूर्या बोलत असताना गंभीर त्याचं म्हणणं खूप गांभिऱ्यानं ऐकून घेत होता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहनं चांगला मारा करत ३ विकेट्स घेतल्या. यामुळं २०० टप्पा पार करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दक्षिण अफ्रिकेला १८७ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानं २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. मात्र भारतीय फलंदाजांनी याच्यावर पाणी फेरलं.
दक्षिण अफ्रिकेकडून डेविड मिलरनं ३५ चेंडूत ६३ धावा केल्या. तर डेवाल्ड ब्रेविसने ४५ धावांचे योगदान दिलं. ट्रिस्टन स्टब्सने देखील नाबाद ४४ धावा करत दक्षिण अफ्रिकेला १८० चा टप्पा पार करून दिला.
धावांचा पाठलाग करत असताना टीम इंडियानं ठराविक अंतानं विकेट गमावल्या. इशान किशन शुन्य, तिलक वर्मा १ धाव करून बाद झाला. अभिषेक शर्मा १५ धावांवर बाद झाला. डाव सावरण्याचा प्रयत्न करणारे सूर्यकुमार आणि हार्दिक हे दोघेही प्रत्येकी १८ धावांवर बाद झाले.
भारताकडून शिवम दुबे एकटाच लढला. त्यानं ३५ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याच्यासोबत भागिदारी होऊ शकली नाही. दक्षिण अफ्रिकेकडून मार्को जानसेनने २२ धावात ४ विकेट्स घेतल्या. तर केशव महाराजनं ३ विकेट्स आणि बॉशने २ विकेट्स घेतल्या.
आता या पराभवानंतर २६ फेब्रुवारीला होणाऱ्या झिम्बाब्वे विरूद्धचा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. तसेच १ मार्च रोजी होणारा वेस्ट इंडीजचा सामना देखील जिंकला तरच भारताच्या सेमी फायनलच्या आशा जिवंत राहू शकतात. विशेष म्हणजे टी २० वर्ल्डकपमध्ये २०२२ मध्ये सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतरची दुसरी हार आहे. तत्पूर्वी भारत टी २० वर्ल्डकपमध्ये एकही सामना हरला नव्हता.