Nagraj Manjule Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. मात्र, हा चित्रपट पडद्यावर आणण्याचा प्रवास सोपा नव्हता. विशेष म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे या प्रकल्पातून बाहेर का पडले, याबाबतचा खुलासा आता स्वतः रितेश देशमुख यांनी केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना रितेश देशमुख यांनी सांगितले की, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट त्यांनी सुरुवातीपासून मराठीतच बनवण्याचा निर्णय घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा मराठी मातीशी जोडलेली असल्याने हा सिनेमा मराठी भाषेतूनच प्रभावीपणे मांडायचा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
रितेश यांनी सांगितले की, या चित्रपटाचा पहिला प्रयत्न २०१६ मध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत सुरू झाला होता. मात्र, काही कारणांमुळे तो प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत या विषयावर चर्चा सुरू केली. नागराज मंजुळे यांच्या शैलीत शिवरायांची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्येही होती. पण त्याच काळात कोरोनाचा आला आणि हा प्रकल्प पुन्हा रखडला.
याचदरम्यान, चित्रपटाची निर्मिती पुढे कशी न्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी जेनेलिया देशमुख यांनी रितेश देशमुख यांना स्वतःच कथा लिहिण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रितेश यांनी स्वतः या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आणि चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनावर काम सुरू केले.
नागराज मंजुळे चित्रपटातून बाहेर पडण्यामागे कोणतेही वाद किंवा मतभेद नव्हते, तर कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि प्रकल्प रखडल्यामुळे हा बदल घडल्याचे रितेश यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. भव्य सेट्स, दमदार कलाकार आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित कथा यामुळे चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटासाठी रितेश देशमुख यांनी घेतलेली मेहनत आणि अनेक वर्षांचा संघर्ष आता पडद्यावर दिसून येत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.