

Raj Thackeray Maharashtra Day: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मुंबईच्या इतिहासाबाबत भावनिक पोस्ट करत राज्य सरकार आणि मराठी समाजाला प्रश्न विचारले आहेत. मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली असून, महाराष्ट्र दिन साजरा करण्याबाबत सरकारच्या उदासीनतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. मात्र, या ठिकाणी कोणतीही विशेष सजावट किंवा उत्साह दिसून आला नाही, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्र दिन हा केवळ सरकारी औपचारिकता म्हणून साजरा केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेला संघर्ष आणि त्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण जिवंत ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. मुंबई शहर उभं करण्यामध्ये मराठी माणसाचे योगदान मोठे आहे. या शहरासाठी मराठी माणसांनी घाम आणि रक्त सांडले, पण आज त्याच्या इतिहासाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना म्हटले की, महाराष्ट्र दिनाबद्दल सरकारमध्ये अनास्था निर्माण झाली आहे का, असा प्रश्न पडतो. जर एखाद्या विशिष्ट समाजाचा कार्यक्रम असता तर मोठ्या प्रमाणावर सजावट आणि उत्साह दिसला असता, मात्र महाराष्ट्र दिन अत्यंत साध्या आणि सुतकी वातावरणात साजरा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
याचबरोबर त्यांनी मराठी समाजालाही आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. हुतात्मा स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे होते, मात्र तिथे अपेक्षित गर्दी दिसत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. राज्यभरातून मराठी नागरिकांनी १ मे रोजी हुतात्मा स्मारकाला भेट द्यावी, हुतात्म्यांना अभिवादन करावे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई ही मराठी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, हे शहर मराठी माणसांनी घडवले आणि संघर्ष करून मिळवले. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि प्रांताचा अभिमान जपणे गरजेचे आहे.
“जोपर्यंत आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि प्रांताचा अभिमान बाळगत नाही, तोपर्यंत इतरांकडून सन्मानाची अपेक्षा करता येणार नाही,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या पोस्टनंतर युक्त महाराष्ट्र चळवळीच्या स्मृती जपण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.