पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड गायक लकी अलीने एका आयएएस अधिकाऱ्यावर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे. लकी अलीने म्हटले की, आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून बंगळुरुच्या बाहेर असणाऱ्या शेतजमिनीवर अवैधरित्या कब्जा केला आहे. ही जमीन आता येलहंकातील कंचनहल्ली क्षेत्रात आहे.
बंगळुरुच्या न्यू टाऊन पोलिस स्टेशनमध्ये बॉलीवूड गायक लकी अलीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत लकी अलीने आयएएस अधिकाऱ्यावर आरोप करत म्हटले की, रोहिणी सिंधुरी यांनी शेतजमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्यासाठी राज्य सरकार आणि आपल्या अधिकाराचा वापर केला आहे.
या प्रकरणी लकी अलीने आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि त्यांचे पती सुधीर रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बॉलीवूड गायक लकी अली आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यामध्ये ट्रस्टच्या मालकीच्या शेतजमिनीचा वाद अनेक दिसांपासून सुरू आहे. स्वत: लकी अलीने सोशल मीडियावर देखील ही माहिती शेअर केली होती. त्यात हे सांगण्यात आलं होतं की, स्थानिक पोलिस रोहिणी यांचे समर्थन करत आहेत. रोहिणी यांनी भू-माफियांसोबत मिळून शेतजमीन हडपण्याचे षड्यंत्र रचत आहेत.
डिसेंबर, २०२२ मध्ये लकी अलीने याप्रकरणी ट्विट करत सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आणि आता या प्रकरणी लकी अलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता पाहावं लागेल की, अखेर हे प्रकरण कुठेपर्यंत जातं.
लकी अली हे बॉलीवूडचे ९० च्या दशकातील लोकप्रियक गायक आहेत. त्यांनी कहो ना प्यार है चित्रपटातील ‘क्यों चलती है पवन’ गाणे गायले होते, ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
लकी अलीने चित्रपट सूर मधून अभिनयाची सुरुवात केली होती. पण, अभिनयात ते फारसे यशस्वी ठरले नाहीत.