Kapil Sharma Canada Cafe Firing
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॅनडामधील सरे (Surrey) येथे त्याच्या 'कॅप्स कॅफे' (Kap's Cafe) जवळ असलेल्या एका रेस्टॉरंटवर गोळीबाराची घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांनुसार, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून कपिल शर्माला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सोशल मीडियावर 'टायसन बिश्नोई जोरा सिद्धू' नावाच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरे येथील 'चाय सुट्टा बार' (Chai Sutta Bar) वर गोळीबार करण्यात आला, जो कपिल शर्माच्या कॅफेच्या अगदी शेजारी आहे.
गँगने या पोस्टद्वारे कपिल शर्मा आणि कॅफे मालकाला इशारा दिला आहे की, "आमचा वेळ वाया घालवू नका आणि ताळ्यावर या. त्यांनी अटी मान्य केल्या नाहीत, तर कपिल शर्माचा कॅफे आणि मुंबईतील त्याच्या घरालाही अशाच परिणामांना सामोरे जावे लागेल. मात्र, या सोशल मीडिया दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
कपिल शर्माच्या कॅफेला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी त्याच्या कॅफेवर झालेल्या हल्ल्यांचा एक स्पष्ट पॅटर्न पाहायला मिळाला होता. १० जुलै २०२५: 'कॅप्स कॅफे'च्या उद्घाटनानंतर काही दिवसांतच पहिला गोळीबार झाला. हल्लेखोरांनी इमारतीच्या खिडक्यांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर ७ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा कॅफेवर अनेक राउंड फायरिंग करण्यात आली. चार महिन्यांच्या आत तिसऱ्यांदा कॅफेला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर बिश्नोई नेटवर्कशी संबंधित लोकांनी सोशल मीडियावर याची जबाबदारी स्वीकारली होती.
गँगच्या दाव्यांनुसार, कपिल शर्माला लक्ष्य करण्याचे मुख्य कारण त्याचे अभिनेता सलमान खान सोबत असलेले जवळचे संबंध आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या लाँचिंगला सलमान खानला आमंत्रित केल्यामुळे बिश्नोई गँग संतापली आहे. टोळीच्या एका सदस्याने यापूर्वीच इशारा दिला होता की, सलमान खानसोबत काम करणार्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.लॉरेन्स बिश्नोई गँग आणि सलमान खान यांच्यातील शत्रुत्व १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित आहे. बिश्नोई समाज काळवीटाचा पवित्र मानतो आणि याच कारणामुळे ही गँग गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना धमक्या देत आहे.
यापूर्वी आपल्या 'किस किसको प्यार करूं २' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान कपिल शर्माने या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. कॅनडाचे नियम आणि पोलीस कदाचित अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम नाहीत, असे आपल्याला वाटते, असे तो म्हणाला होता. या हल्ल्यांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी भारतात कपिल शर्माची सुरक्षा वाढवली आहे.