बी. आर. चोपडा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेत युधिष्ठिराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांनी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत प्रभावी दिसत असल्याचे त्यांनी मान्य केले असले, तरी चित्रपटाचा ट्रेलर मात्र आपल्याला पूर्णपणे भावला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तसेच त्यांनी चित्रपटाच्या टायटलवरही आक्षेप घेतला.
टायटल विषयी काय म्हणाले गजेंद्र चौहान?
अभिनेते गजेंद्र चौहान यांनी 'रामायण' (Ramayana) या चित्रपटाच्या टायटलवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, ''ते याला 'रामायण' (Ramayana) म्हणत आहेत, पण ते 'रामायण' (Ramayan) आहे." त्यांनी पुढे म्हटले की, "आपण हिंदी भाषेत काम करतो, पण इंग्रजीचा वापर करतो." ते म्हणाले, "मला माहित आहे की तुम्ही जागतिक प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवत आहात, पण 'लगान' हा देखील जागतिक स्तरावरील चित्रपट नव्हता का? तुम्ही हिंदी नावासह चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित करू शकता.''
एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत गजेंद्र चौहान यांनी विशेषतः कैकेयीच्या व्यक्तिरेखेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रभू राम यांना वनवास देण्याची मागणी करणाऱ्या कैकेयीच्या प्रसंगातील तिची वेशभूषा आणि सादरीकरण पारंपरिक रामायणातील व्यक्तिरेखेशी विसंगत वाटल्याचे त्यांनी म्हटले. कैकेयीला अतिशय आधुनिक पद्धतीची साडी नेसवण्यात आल्याचे सांगत, हा सीन आपल्याला अजिबात आवडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, मंथरेच्या प्रभावामुळे कैकेयी रामाच्या वनवासाची मागणी करते आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यामुळे हा प्रसंग अधिक प्रभावीपणे सादर करता आला असता.
दरम्यान, प्रभू राम यांच्या भूमिकेतील रणबीर कपूरबाबत मात्र गजेंद्र चौहान यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. रणबीर मोठा स्टार असून त्याची स्वतःची वेगळी ओळख आहे, असे ते म्हणाले. चौहान यांनी रणबीरच्या अभिनयावर मात्र घाईघाईने मत देणे टाळले. प्रभू राम यांच्या भूमिकेबाबत भारतीय प्रेक्षकांच्या मनात आधीपासूनच एक ठरावीक प्रतिमा आहे. विशेषतः याआधी पडद्यावर साकारलेल्या प्रभू राम यांच्या भूमिकांमुळे ही प्रतिमा अधिक घट्ट झाली आहे. त्यामुळे नव्या अभिनेत्यासाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
फक्त ट्रेलर किंवा काही झलक पाहून रणबीरच्या कास्टिंगवर निर्णय देणे योग्य ठरणार नाही. त्याचा अभिनय कसा आहे, हे संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच ठरवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.