डोंबिवली : मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. डोंबिवलीसारख्या मराठी संस्कृतीचा गड मानल्या जाणाऱ्या शहरात मराठी भाषेबाबत आलेल्या एका कटू अनुभवावर तिने बोट ठेवले आहे.
भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘मराठी भाषा दिनाच्या आधी थोडं.... डोंबिवलीसारख्या ठिकाणी आपण मराठीत बोलल्यावर 'नो मराठी, ओन्ली हिंदी' हे बोललं जातंय.’
डोंबिवली हे शहर मराठी संस्कृती, कला आणि साहित्याचे केंद्र मानले जाते. या शहराला 'सांस्कृतिक राजधानी' म्हणूनही ओळखले जाते. मात्र, अशा ठिकाणीही जर मराठी माणसाला स्वतःच्या भाषेत बोलण्यापासून रोखले जात असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. भाग्यश्रीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा 'मराठी भाषेचा सन्मान' या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
भाग्यश्रीच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी आणि मराठी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. हा मराठी भाषेचा अनादर असून महाराष्ट्रात, विशेषतः डोंबिवलीत राहून मराठीला नाकारणे हे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मराठी भाषा दिनापूर्वीच असा अनुभव येणे दुर्दैवी आहे. प्रशासनाने आणि स्थानिक संघटनांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
भाग्यश्री मिलिंद ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'आनंदी गोपाळ' सारख्या गाजलेल्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ती सामाजिक आणि भाषिक मुद्द्यांवर नेहमीच आपली मते ठामपणे मांडताना दिसते.
मराठी भाषा दिनाच्या उंबरठ्यावर असताना एका अभिनेत्रीने मांडलेली ही व्यथा नक्कीच विचार करायला लावणारी आहे. आता यावर डोंबिवलीकर आणि मराठी संघटना काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.